दिनेश राव यांची टीका : काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे रविवारी(दि.30) महात्मा गांधीजींची 74 वी पुण्यतिथी साजरी केली. 30 जानेवारी 1948 रोजी महात्म गांधीजींची हत्या झाली. भाजप महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर केवळ स्वतःच्या प्रचारासाठी करतो, अशी टीका काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी यावेळी केली.
यावेळी जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, एआयसीसी मीडिया प्रभारी अलका लांबा, जीपीसीसी उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, सुनील कवठणकर, विठू मोरजकर, हिमांशू तिवरेकर, नौशाद चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
शंभूभाऊ बांदेकर म्हणाले की, गांधीजींनी ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ या तत्त्वांनी संपूर्ण जगाचे मन जिंकले. एवढा महान नेता भारतात जन्माला आला याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, असे ते म्हणाले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही सन्माननीय पदवी दिली, मात्र मोदी सरकार त्यांचा अनादर करते. मात्र जेव्हा ते महात्मा गांधीजींचा अनादर करतात हा नेताजींचाही अनादर आहे, अशा शब्दांत अलका लांबा यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महात्मा गांधींच्या तत्त्वांनुसार काँग्रेसचे कार्य पुढे जाईल, असेही त्या म्हणाल्या.
महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा जगाला धक्का बसला होता. हा आपल्या देशातील पहिला दहशतवादी हल्ला होता. आरएसएसच्या द्वेषपूर्ण विचारसरणीने नथुराम गोडसेला दहशतवादी बनण्यास आणि महात्मा गांधींना मारण्यास भाग पाडले, मात्र गांधीजीचे विचार आणि तत्वे मारू शकले नाहीत, अशी टीका गिरीश चोडणकर यांनी केली.
गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध अहिंसक लढा दिला. महात्मा गांधी आणि इतर नेत्यांच्या नेतृत्वामुळे आपला देश एकसंध राहिला. आज पुन्हा फूट पडत आहे. लोक द्वेष आणि हिंसाचाराची भाषा बोलत आहेत. धर्माचा वेश वापरून काही लोक हिंसाचाराला चिथावणी देत आहेत आणि लोकांना ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. हे खूप वाईट आहे, असे ते म्हणाले. देशाच्या रक्षणासाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.