सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉडसारखे शब्द सतत आपल्या कानी पडत असतात. सध्याच्या स्मार्ट युगात ऑनलाईन व्यवहार वाढलेले असताना सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येतं. आपण नकळत या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत जातो आणि मोठं नुकसान करून घेतो. या सायबर गुन्ह्यांचा शोध घेऊन गुन्हेगारांना पकडणं खूपच अवघड असतं. गाझियाबादच्या कामाक्षी शर्माने या विरोधात दंड थोपटले आहेत. तिने तब्बल 50 हजार पोलिसांना सायबर गुन्हेविरोधी प्रशिक्षण दिलं आहे.
सायबर गुन्ह्यांना कोण, कधी बळी पडेल याचा काहीच नेम नसतो. कोरोना काळात तर ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ऑनलाईन व्यवहारांचं वाढतं प्रमाण याला कारणीभूत ठरत आहे. ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं वाढत असताय1ना त्याला आळा घालणंही आवश्यक आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात असले तरी त्यांना म्हणावं तितकं यश मिळताना दिसत नाही. सायबर गुन्हेगार गुन्हे करतात आणि सर्वसामान्य लोक या गुन्ह्यांना बळी पडतात. गाझियाबादच्या कामाक्षी शर्माने ही सायबर गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. तिचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. कामाक्षीने 50 हजार पोलिसांना सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठीचं प्रशिक्षण दिलं असून सर्वसामान्यांना जागरूक करण्यासाठी अभियानही राबवलं जात आहे.
कामाक्षी कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून मित्रमैत्रिणींचा ई मेल आयडी हॅक करायची. हीच आवड किंवा छंद तिच्या उपयोगी पडला. त्यातच सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे याची जाणीव तिला झाली. मग काय कामाक्षी कामाला लागली. हॅकर्स फसवणुकीने लोकांना लुबाडत असताना पोलीस त्यांना का पकडू शकत नाहीत, असा प्रश्न तिला पडला. मग तिने पोलीस अधिकार्यांसोबत काम करायला सुरूवात केली. 2017 पासून ती हे काम करत असून पोलिसांशी संपर्क करून त्यांना प्रशिक्षण देण्याचं मोलाचं काम करते आहे. फोन ट्रेस करणं, आयपी ऍड्रेस शोधणं यांसारख्या कामांसाठी पोलीस तिची मदत घेऊ लागले. त्यानंतर मिशन सायबर क्राईम ही योजना राबवण्यात आली. याअंतर्गत काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभरातल्या तब्बल 50 हजार पोलिसांना याबाबत प्रशिक्षित करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली आणि कामाक्षीने ही जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पार पाडली.
कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं कामाक्षीचं म्हणणं आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लोकांनी अधिक सजग होणं आवश्यक असल्याचं ती सांगते. कामाक्षी अनेक गुप्तहेर संस्थांसोबत काम करते आहे. तिला सायबर गुन्हेगारांना धडा शिकवायचा आहे. कामाक्षीच्या प्रयत्नांमुळे सायबर गुन्हेगारीला आळा बसला तर ते तिचं मोठं यश ठरू शकतं.