आतापर्यंत केवळ 15 हजार 926 जणांनी घेतली कोरोनाची लस
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात कोव्हीशिल्डची 11 हजार 502 व कोव्हॅक्सिनचे 4424 मिळून 15 हजार 926 कोरोना लसीचे डोस नागरिकांना सहा केंद्रावर देण्यात आले.
तालुक्यात सांगेली व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सिनची तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय, आंबोली, मळेवाड, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच संजीवनी रुग्णालय येथे कोव्हीशिल्डची लस देण्यात येत आहे. सावंतवाडी तालुक्यात प्रत्येक खेपेला दोन्ही लसीचे मिळून 1900 डोस प्रत्येक वेळेला येतात. त्यात कोव्हॅक्सीनचे सहाशे तर कोव्हीशिल्डचे अकरा डोस असतात. तालुक्यात येणारे डोस पाहता ते कमी डोस आहेत. त्यामुळे धिम्यागतीने लसीकरण होत आहे. त्यामुळे कारोना लसीच्या डोसचा जादा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयात 500 डोस येतात. हे डोस दोन दिवसात संपतात. शहरात ग्रामीण भागातील लोकही लस घेतात. त्यामुळे ही लस संपते. त्यामुळे शहरात लसीचे डोस वाढविण्याची मागणी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. शहरात डोस वाढविल्यास शहरातील लसीकरण लवकर संपण्यास मदत होणार आहे.
जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. तालुक्यात कोव्हीशिल्डच्या डोसचा जादा प्रमाणात पुरवठा होत आहे. उपजिल्हा रुग्णालयात पाचशे तर, संजीवनी रुग्णालय, मळेवाड, आंबोली व निरवडे येथे प्रत्येकी दोनशे कोव्हीशिल्डचे डोस येतात. तर सांगेली, बांदा येथे कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी तीनशे डोस येतात. कोव्हीशिल्डचे आतापर्यंत 11950 डोस आले होते. त्यापैकी 11 हजार 502 डोसचा वापर झाला. तर कोव्हॅक्सिनचे 4570 डोस आले होते. त्यापैकी 4424 डोसचा वापर झाला. शहरात सहा हजार 380 डोस आले होते. त्यापैकी 6252 डोसचा वापर झाला. 4584 जणांनी पहिला डोस घेतला. तर 1508 जणांनी दुसरा डोस घेतला. सध्या कारोना लसीचे तालुक्यात डोस कमी येत आहेत. त्यामुळे दोन दिवसात डोस संपत आहेत. लसीचे डोस कमी येत असल्याने लसीकरण धिम्यागतीने होत आहे. त्यामुळे डोस वाढविण्याची मागणी आहे. डोस मुबलक आल्यास लसीकरण वेगाने होण्यास मदत मिळणार आहे. दोन दिवसात डोस संपल्यानंतर कर्मचाऱयांनाही काम राहत नाही. सुरुवातीला ऑफलाईन नोदणीद्वारे लस देण्यात येत होती. परंतु आता ऑनलाईन नोंदणी होत आहे. त्यामुळे गोंधळ आहे. सर्वसामान्य लोक नोंदणी करून लस कशी घेणार? हा प्रश्न आहे. तर येत्या 4 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी आणखी उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून नियोजन करून केंदांची संख्या वाढविण्याबरोबर लसीचे डोस वाढविण्याची गरज आहे.