प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील विजयनगर येथे रेल्वेखाली पडून भोसे येथील पोपट उर्फ भगवान बिरु शेजाळ (वय 50) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजाळ यांनी खाजगी सावकारांच्या कर्जवसुली तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. खाजगी सावकारांची नावे असलेली चिठ्ठी शेजाळ यांच्या मृतदेहाजवळ सापडली असून याबाबत मिरज रेल्वे पोलीस चाैकशी करीत आहेत. या घटनेमुळे भोसे गावात खळबळ उडाली होती.
पोपट शेजाळ हे भोसे येथील शेतकरी असून मंगळवारी सकाळी मिरज -पुणे रेल्वे मार्गावर विजनगर येथे कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. अपघातात त्यांचे धड व शीर वेगळे होऊन रेल्वे इंजिनासोबत 50 मिटर अंतरापर्यंत मृतदेह फरपटत गेले. अपघाताबाबत माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मिरज शासकीय रुग्णालयात शेजाळ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबाच्या ताब्यात दिला. शेजाळ यांच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत काही खाजगी सावकारांची नावे असल्याची माहिती मिळाली.
शेजाळ हे भोसे वनक्षेत्रात मजूर म्हणून काही काळ काम करीत होते. खाजगी सावकारांनी त्यांच्यामागे कर्जवसुलीचा तगादा लावून त्यांची जमीनही लिहून घेतल्याने शेजाळ अस्वस्थ होते अशीही चर्चा आहे. शेजाळ यांनी खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकारामुळे ऐन दिवाळीतच त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.