सावकार परवानाधारक असणे आवश्यक, आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबियांना 5 लाख
प्रतिनिधी /बेंगळूर
केवळ बँकांमधूनच नव्हे, तर खासगी सावकारांकडून घेतलेली कर्जे फेडण्यास असमर्थ ठरल्याने आत्महत्या करणाऱया शेतकऱयांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र, त्या शेतकऱयाने अधिकृत परवाना असलेल्या सावकारांकडून कर्ज घेतलेले असावे, अशी अट घालण्यात आली आहे. ही माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.
प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत 2016 पासून पीकनुकसानीचा विमा मिळालेला नाही, अशी तक्रार करून यादगीर येथील शेतकऱयांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या विभागीय पीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी सरकारच्या वतीने बाजू मांडताना ही माहिती देण्यात आली. 8 जुलै रोजी यासंबंधीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
मात्र, राज्य सरकारचा आदेश पक्षपाती आहे, असा आक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील क्स्टिन रोजारियो यांनी घेतला. शेतकरी खासगी सावकारांकडून कर्जे घेत असताना त्यांच्याजवळ कर्ज वितरीत करण्याचे लायसन्स आहे का, याची विचारणा करत नाहीत. ही बाब त्यांना ठाऊन नसते. त्यामुळे परवाना असणाऱया सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबालाच मदत देणे आणि इतरांना मदत नाकारणे ही भूमिका योग्य नाही. त्यामुळे आत्महत्या केलेल्या सर्वच शेतकऱयांच्या कुटुंबांना मदत द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना उच्च न्यायालयाने, राज्य सरकारच्या आदेशाविरोधात याचिका दाखल करण्यास तक्रारदार स्वतंत्र आहेत, असे म्हटले आहे. शिवाय सरकारने घेतलेल्या आदेशानुसार पात्र शेतकऱयांच्या कुटुंबांना मदत वितरीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. तसेच मदत देण्यात आल्यासंबंधीचा अहवालही सादर करावा, अशी सूचना देऊन सुनावणी 13 ऑगस्टपर्यंत लांबणीवर टाकली.
सरकारला सूचना…
राज्य सरकारने दिलेल्या माहितीवर न्यायालयाने काही सूचना केल्या. तसेच शेतकऱयांच्या कुटुंबाला मदत देण्याच्या बाबतीत भेदभाव करणे योग्य नाही. तसे केल्याने समानतेच्या हक्काचे उल्लंघन होईल अशीही टिप्पणी केली परवाना नसणाऱया खासगी सावकाराकडून कर्जे घेतलेल्या आणि ते फेडणे शक्य न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱयाच्या कुटुंबालाही देण्याचा विचार करावा, अशी सूचना केली.