तसे पाहिल्यास कमाल तापमान वाढत राहणार हे भाकीत करण्यास कोणाही तज्ञांची गरज नाही. मात्र गेल्या आठवडय़ातील 14 मार्च रोजीच्या मुंबईतील कमाल तापमानाच्या नोंदीने मुंबईकरांची झोपच उडवली. मार्च महिना वातावरण बदलातील संधीकाल मानला गेल्यास या महिन्यात कमाल तापमानाने सरासरी ओलांडणे ओघाने आलेच… मात्र त्यावर नियंत्रण राखण्याचे नियोजनही होणे आवश्यक असल्याने वेळीच सावध व्हावे असे काही मार्च महिन्यातील कमाल तापमानाची आकडेवारी सांगते.
मार्च महिन्यात थंडी जाऊन उन्हाळ्याचा प्रवेश होत असतो. म्हणजे दोन ऋतू बदलातील संधीकाल म्हणजे मार्च महिना होय. या महिन्यात कमाल तापमान 40 अंशावर जाणे नवे नाही. मात्र ते 2000 सालानंतरच्या पुढील वर्षात तब्बल आठ वेळा नोंद होणे ही बाब चिंतनीय नक्कीच आहे. तसेच 2011 नंतरच्या दहा वर्षात सात वेळा नोंदणे हे अतिचिंतनीय आहे. मुंबईत 12 मार्चपासून 16 मार्चपर्यंत उपनगरातील कमाल तापमान हे 37 ते 39 अंशांहून अधिक राहिले. यात 14 मार्च रोजी 39.6 अंशांवर कमाल तापमान नोंदविण्यात आले. या दिवशी समुद्रावरुन येणारे वारे उशिराने वाहिले, त्यामुळे जमिनीवरील वारे थंड होण्यास उशीर झाला. समुद्रावरुन येणारे वारे त्या तीन दिवसात दीड तास उशिराने वाहत होते. त्यामुळे पारा वाढत होता. त्यात भर पडली ती वायव्य भारतातून येणाऱया शुष्क वाऱयाची. या वाऱयाचा परिणाम मुंबईसह कोकण किनारपट्टीवर झाला. त्यामुळे येथील कमाल तापमान वाढले होते. 12 ते 17 मार्च दरम्यान आर्दतेची टक्केवारी देखील 15 ते 22 एवढी नोंदवली गेल्याने वातावरणात अस्वस्थता पसरली होती. यातून कोकण किनारपट्टीसह मुंबईकरांची काहिली वाढली. 14 मार्च रोजीची 39.6 अंश एवढे कमाल तापमान असलेली नोंद या मोसमातील उच्चांकी ठरली होती. मात्र त्यापूर्वी 13 मार्च रोजी समुद चौपाटय़ांपासून थोडय़ा दूर असलेल्या उपनगरातील अंतर्गत भागात हेच कमाल तापमान 39 अंशाहून अधिक होते. त्या दिवशी चेंबूरमध्ये 40.7, घाटकोपर तसेच पवईत 40.3 तर राम मंदिर आणि
मुलुंड 40 अंश असे कमाल तापमान नोंदविण्यात आले. तर कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणे 40 अंशाला स्पर्श करणारी अशी होती. डहाणू 38, छ. शिवाजी महाराज स्थानक तसेच माटुंगा 38.3, वाशी आणि नवी मुंबई 38.4, सांताक्रुझ 38.6, पालघर आणि विरार 39.5, उल्हासनगर आणि पनवेल 39.3, कोपरखैरणे आणि नवी मुंबई महानगरपालिका 39.4, बदलापूर 39.5, भिवंडी 39.6, ठाणे 39.7, कल्याण, डोंबिवली 39.7, तळोजा 39.7, तर रत्नागिरी 39.3 अंश तापमानाची नोंद उतरत्या क्रमाने कोकण किनारपट्टीत नोंदविण्यात आली होती. मुंबई शहर वगळता मुंबई उपगरातील कमाल तापमानाच्या आकडेवारीवर जास्त भर देण्यात आला आहे. कारण शहराच्या तुलनेत उपनगरात निसर्गामुळे कमाल तापमानाची नोंद कमी होणे आवश्यक होते. मात्र तसे न होता, शहराच्या नोंदीपेक्षा उच्चांकात उपनगरे एक पाऊल पुढेच होती. पुन्हा 17 मार्च रोजी कमाल तापमानात वाढ झाली. तेव्हाही उच्चांकाने तापली ती उपनगरेच. जसे विक्रोळी 44.5, मुलुंड 42 तर पवई 41.5, घाटकोपरमध्ये 39.4 अंश एवढी नोंद करण्यात आली. मार्च महिन्यातच कमाल तापमान टिपेला जाऊन नोंदवले जाते. पुढे एप्रिल मे महिन्यात ते स्थिर होत जाते. असा तापमान नोंदीचा शिरस्ता आहे. 2018 या वर्षात रायगड जिह्यातील भिरा गावातील कमाल तापमानाने जागतिक नोंद केली होती ती देखील मार्च महिन्यातीलच. तेही उपनगरातील स्थानिक ठिकाणांच्या नोंदीहून एक अंशांने कमीच. कारण 25 मार्च 2018 पासून सतत दोन दिवस भिऱयातील कमाल तापमान 40 अंशांवर नोंदविले जात होते. तर गेल्या आठवड्यातील मुंबई उपनगरातील काही ठिकाणी कमाल तापमान 41 अंश ओलांडले होते.
गेल्या 40 वर्षात मार्च महिन्यात मुंबई उपनगरांत तब्बल बारा वेळा 40 ते 41 अंशावर कमाल तापमान नोंदविले गेले. 17 मार्च 2011 मध्ये सर्वाधिक 41.3 अंश, 12 मार्च 1985 मध्ये 41.1, 31 मार्च 1999 मध्ये 41.0 18 मार्च 2011 मध्ये 41.0, 26 मार्च 2018 मध्ये 41.0, 28 मार्च 2021 मध्ये 40.9, 26 मार्च 2015 मध्ये 40.8 अंश, 26 मार्च 2000 मध्ये 40.5, 8 मार्च 2013 मध्ये 40.5 अंश, 26 मार्च 2019 मध्ये 40.3 अंश, 29 मार्च 1982 मध्ये 40.2 अंश, 17 मार्च 2007 मध्ये 40.0 अंश अशी नोंद झाली असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने सांगितले. यात प्रामुख्याने पाहिल्यास वर्ष 2000 नंतरच सर्वाधिक वेळा तापमान वाढीची नोंद झाली आहे. त्यातही 2011 या वर्षात आतापर्यंतचे 41.3 अंश सेल्सिअस एवढे तापमान सर्वाधिक आहे. तसे पाहिल्यास मार्च महिन्यातील सरासरी कमाल तापमान हे 32 ते 33 अंशाएवढे आहे. मात्र या सरासरीत तब्बल सात अंशाने वाढ होणे ही बाब चिंतनीय आहे. 14 मार्च रोजी मुंबई उपगरातील कमाल तापमानाने केलेला कहर हा वायव्य भारतातून येणारे शुष्क वारे, समुद्रावरुन उशिरा आलेले थंड वारे, पश्चिमी वाऱयामुळे वाढलेला लाटेचा कालावधी अशी कित्येक कारणे असली तरी देखील निसर्गातील मानवी हस्तक्षेपही तेवढाच कारणीभूत असल्याचे दिसून येईल. मुंबईतील विकास कामे पाहिल्यास मुंबईतील ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांसाठी पुरक असल्याचे दिसून येईल. आक्रसत जाणारे समुद्र किनारे, हिरवेपट्टे नाहिशे करुन उभारण्यात येणारे प्रकल्प, उभारण्यात येणाऱया गगनचुंबी इमारती, डंपिंगग्राऊंड अशी यादी पाहिल्यास ही हवामान बदलाच्या नकारात्मकतेत भर घालणारी आहेत. ही विकासकामे निसर्गाला कमीत कमी नुकसान करुन केली गेल्यास फायदेशीर ठरु शकते. मात्र त्यावर कोणी विचार करताना दिसून येत नाही. म्हणून तर मुंबई पावसात तुंबते, तर कधी मुंबईतील टेकड्या घरंगळून खाली येतात. तर कधी प्रदुषणात धुंद होते. यातून हवेची गुणवत्ता तर खालावतेच शिवाय वातावरणाचा दर्जाही खालावतो. मार्च महिन्यातील कमाल तापमानातील वाढ बऱयाच वर्षांनी होत असली तरी त्यातील वारंवारता गेल्या दशकभरात वाढली असल्याची नोंद घेणे आवश्यक झाले आहे.
राम खांदारे