सुदैवाने जीवित हानी झाली नाही
प्रतिनिधी / कसबा बीड :
सावरवाडी तालुका करवीर येथील शंभर वर्षाचा साक्षीदार असलेला वटवृक्ष वादळी पावसामुळे उन्मळून पडला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. गावातील वटवृक्ष पडला ही बातमी समजताच गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली. गेले दोन-तीन दिवसमृग नक्षत्रातील जोरदार स्वरूपात वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्या सोबत संततधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील तुळशी नदीच्या तीरावरील महादेव सातेरी मंदीर परिसरातील शंभर वर्षाचा साक्षीदार असलेला वृक्ष उन्मळून पडला. या घटनेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
सावरवाडी गावात दसरा सणामध्ये पालखी सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम तुळशी नदी तिरी साजरे होत असते. हरी नाम सप्ताह सोहळा, महाप्रसाद वाटप कार्यक्रम या वृक्षाखाली साजरे केले जात होते. हा वृक्ष या परिसरातील प्राचीन सौदर्याचे ठिकाण असायचा. जोरदार पावसामुळे नदीपात्रातील पाणी पात्राबाहेर पडल्याने हा वृक्ष उमलून पडला. नदीतीरावरील जूना वृक्ष उमलून पडल्याने ग्रामस्थाची मंदीर परिसरात गर्दी उडाली होती. जूना वृक्ष कोसळल्याने गावच्या पर्यावरण क्षेत्राची मात्र हानी झाल्याने ग्रामस्थ वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.