मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा : फातोडर्य़ात दामू नाईक यांचा प्रचार सुरू
प्रतिनिधी /मडगाव
सासष्टीतील आठ मतदारसंघात यावेळी भाजपचा पाठिंबा लाभलेले उमेदवार असतील व या आठ मतदारसंघापैकी जास्तीत जास्त मतदारसंघात भाजपचेचे उमेदवार विजयी होतील असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी फातोर्डा येथे दामू नाईक यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ करताना केला.
फातोर्डा येथील श्री दामोदर (लिंग) देवस्थानात श्रीफळ अर्पण करून दामू नाईक यांनी श्रींचा आशीर्वाद घेतला व आपल्या प्रचार कार्याला सुरवात केली. यावेळी त्यांनी येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चपेलला देखील भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे सरचिटणीस व माजी खा. ऍड. नरेंद्र सावईकर, मडगावचे भाजपचे उमेदवार डॉ. जगन्नाथ उर्फ देश प्रभुदेसाई, भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, फातोर्डा भाजप मंडळाचे सर्व पदाधिकारी, भाजपचे सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सासष्टीतील आठ पैकी दोन-तीन मतदारसंघात जरी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली जात नसली तरी अपक्ष म्हणून उमेदवार असतील व त्यांना भाजपचा पाठिंबा असेल व हे उमेदवार विजयी होतील. फातोर्डा, मडगाव, नावेली, कुंकळळी व कुडतरी या पाच मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार असतील. तर नुवे, बाणावली व वेळळी या तीन मतदारसंघ पक्षा तर्फे अपक्ष उमेदवार उभे केली जातील व त्यांना भाजपचा पाठिंबा असेल.
वेळळीचे आमदार तथा मंत्री फिलीप नेरी रोड्रिग्स व नुवेचे आमदार विल्प्रेड उर्फ बाबाशान डिसा हे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार का असा सवाल पत्रकारांनी केला असता. मुख्यमंत्री म्हणाले, जरी ते पक्षाच्या निवडणुकीवर निवडणूक लढवित नसले तरी ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील व त्यांना भाजपचा पुर्ण पाठिंबा असेल व ते विजयी होतील.
आपल्या राज्यात रक्ताचा अभिषेक घालणाऱयांकडे युती करून कुणी मला संस्कृती शिकवू नये. गोवा हे राज्य सूसंस्कृत आहे व गोव्याच्या विकासासाठी जना पुन्हा एकदा भाजपला संधी देतील. आज सर्वत्र बॅनर्स लावून विद्रूपीकरण करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. त्यावर देखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे जाणार
यावेळी आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना उमेदवार दामू नाईक म्हणाले, आपण या निवडणुकीत सकारात्मक दृष्टीकोन घेऊन पुढे जाणार आहे. फातोडर्य़ात नाना-नानी पार्क असावे हे आपले स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी आपले प्राधान्य असेल. जनतेला भाषणे नको आहेत व विकास हवा आहे.