पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय : लगतच्या राज्यातून मे अखेरपर्यंत पर्यटकांना प्रवेश नाही
कुडाळ शहराला दिली भेट : बाजारपेठेची पाहणी
वार्ताहर / कुडाळ:
कोरोना विरुद्धची लढाई रस्त्यावर उतरुन नाही, तर ती घरात बसून लढायची आहे हे सिंधुदुर्गवासियांनी मनावर घेतले आहे. या जिल्हय़ातील काही व्यवहार पुढच्या आठवडय़ानंतर हळुहळू सुरू करण्याचे विचाराधीन आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. जिल्हय़ाच्या हद्दीलगत असलेल्या राज्यातून एकाही पर्यटकाला मे अखेरपर्यंत येथे प्रवेश दिला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी रात्री येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. परप्रांतीय मजुरांना घरपोच करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत यांनी काल रात्री कुडाळ शहराला भेट देत बाजारपेठेची पाहणी केली. अधिकारी-पदाधिकारी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. कुडाळ न. पं. ने उभारलेल्या निर्जंतुकीकरण मार्गिकेची त्यांनी पाहणी केली. तहसीलदार रवींद्र नाचणकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, नगराध्यक्ष ओंकार तेली व मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याकडून एकंदर व्यवस्थेबाबत माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर व जीवन बांदेकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, भाजपचे जिल्हा चिटणीस बंडय़ा सावंत तसेच नागरिक उपस्थित होते.
कोरोना विरोधी लढा सर्व एकत्र येऊन व राजकीय मतभेद बाजूला ठेवून लढत आहेत, याबाबत सामंत यांनी प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक आमदार व न. पं. प्रशासनाला धन्यवाद दिले.
विकास, सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मात्र, या जिल्हय़ातील काही व्यवहार पुढच्या आठवडय़ानंतर हळुहळू सुरू करण्याच्या विचाराधीन आम्ही आहोत. याचा अर्थ आम्ही सर्व दुकाने उघडणार आहोत, असा नाही, तर काही विकासाची कामे, काही सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत. त्या मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
मे अखेरपर्यंत पर्यटकांना प्रवेश नाही
सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या हद्दीला तीन राज्ये आहेत. त्या राज्यातून एकही पर्यटक मे अखेरपर्यंत या जिल्हय़ात येणार नाही, याची दक्षता घेणार आहोत. ज्या पर्यटकांना सिंधुदुर्गचे निसर्ग सौंदर्य पाहायचे आहे. त्यांनी पावसाळय़ानंतर यावे, असे त्यांनी सांगितले.
परप्रांतीय मजुरांना घरपोच : करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा
परप्रांतीय मजूर आहेत. ते आपल्या मूळ गावी जायला बघतात, याकडे पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता, आपल्या जिल्हय़ातील मजूर बाहेरच्या राज्यात नाहीत. सध्या या जिल्हय़ात बाहेरील मजूर आहेत. त्यांना चौदा-पंधरा दिवस होऊन गेले आहेत. काही दिवसानंतर कामे सुरू झाली, तर तेच कामावर येणार आहेत. ज्या कामगार मजुरांची आपल्या मूळ गावी जायची इच्छा असेल, त्यांना घरपोच करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. मात्र, अन्य राज्यातून कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.
‘त्यां’ना एक मे नंतर येथे आणू!
गोव्यातील माणसांना एवढय़ात आपल्याकडे प्रवेश देणार नाही. गोवा मुख्यमंत्र्यांशी आपण याबाबत चर्चा केली आहे. आमच्या जिल्हय़ातील कामनिमित्त तेथे असलेली सुमारे 730 माणसे अडकली आहेत. त्यांना एक मे नंतर येथे आणू, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मजुरांच्या व्यवस्थेबाबत आढावा
जे मजूर ठेकेदारांकडे काम करीत होते. त्या ठेकेदारांनाच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे, तर ज्या मजुरांना आधार नाही, अशांना अन्नधान्य पुरवित असल्याचे नाचणकर यांनी सांगितले. न. पं. प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, संस्था व नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे, असे नाचणकर व कोरे यांनी सांगितले. शहर परिसरात असलेल्या मजूर कामगारांच्या अन्नपाणी व्यवस्थेबाबत सामंत यांनी आढावा घेतला. आरोग्य, पोलीस, महसूल व न. पं. प्रशासन राबवित असलेल्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून कुडाळवासियांनी केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले. तेली यांनी न. पं. राबवित असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पडते यांनीही चर्चेत भाग घेतला
प्रशासनाकडून अतिशय चांगले काम!
कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर यांच्यासह प्रशासनाची टीम अतिशय चांगले काम करीत आहे. तहसीलदार अहोरात्र वेळ देतात. सर्वसामान्यांचे दूरध्वनी केव्हाही उचलतात. पोलीस निरीक्षक कोरे व त्यांचे सहकारी चांगली सेवा देत आहेत, याकडे पदाधिकारी व नागरिकांनी लक्ष वेधले. त्यावर नाचणकर यांच्या पारदर्शक कामकाजाचा दाखला देत पोलीस व महसूल विभागाच्या कामाचे कौतुक केले.