17 जणांचे नमुने तपासणीसाठी मिरजेला : जिल्हय़ात 458 व्यक्ती विलगीकरणात
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’ची प्राथमिक लक्षणे दिसणाऱया रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्याची संख्या वाढली असून रविवारी सात रुग्ण नव्याने दाखल करण्यात आले. त्यामुळे या वॉर्डमध्ये 36 रुग्ण उपचारार्थ आहेत. तर 17 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिह्यात आतापर्यंत 458 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 404 व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये 54 व्यक्ती असून 119 व्यक्तींनी 28 दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे. जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 36 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी 91 नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यातील 73 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. एकमेव रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. तोदेखील आता निगेटिव्ह अहवाल येऊन कोरोनामुक्त झाला आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी 460 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिह्यात ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे.
जिह्यातील स्थलांतरित, बेघर, मजूर व कामगारांसाठीच्या कॅम्पमध्ये असलेल्यांची प्रशासनातर्फे योग्य काळजी घेण्यात येत असून त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेवण व नाष्टय़ाव्यतिरिक्त त्यांना लागणाऱया वस्तू जसे टुथपेस्ट, साबण यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.
अ.क्र. विषय संख्या
1 घरीच विलगीकरण करण्यात आलेले 404
2 संस्थात्मक विलगीकरणात असलेले 54
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 91
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 74
5 पॉझिटिव्ह आलेले नमुने 1
6 निगेटिव्ह आलेले नमुने 73
7 अलवाल प्राप्त न झालेले नमुने 17
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 36
9 सध्यस्थितीत जिह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 00
9 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 460
अतिरिक्त धान्य देणार
जिह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाऱया 35 किलो धान्याव्यतिरिक्त पाच किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत देण्यात येत आहे. सदरचे मोफत धान्य देताना लाभार्थ्याने स्वाक्षरी किंवा अंगठा द्यायचा आहे. हे धान्य तीन महिने म्हणजेच एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मे व जून महिन्यांकरिता प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आठ रुपये प्रतिकिलो दराने आणि दोन किलो तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार आहे. या धान्याचे वितरण करताना धान्य दुकानदारांनी योग्य खबरदारी घ्यावी व सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.