अध्याय पंधरावा
भगवंत म्हणाले, उद्धवा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर साधक त्यातच गुरफटून जातो व त्याची अध्यात्मिक प्रगती तेथेच खुंटते. अशा प्रकारे सिद्धी माझ्या प्राप्तीला प्रतिबंधक होतात आणि माझे ध्यान, ज्ञान व वैराग्यस्थिती ह्यांपासून साधकाला पराङ्मुख करून निखालस कफल्लक करून सोडतात. विशेष म्हणजे साधकाला माझी प्राप्ती होण्याचा क्षण जवळ आला असतानाच सिद्धींची लुबाडणूक चालू असते. त्या सुखोपभोगाचे आमिष दाखवून छळण्याकरिता मनात मोह उत्पन्न करतात. माझ्या प्राप्तीला विलंब लागण्यास तेच कारण होते. उद्धवा! माझे स्वरूप अद्वैत आहे आणि त्यात सिद्धींची जी अनेक स्वरूपे दिसतात, ती खरोखर मायेची भूल होय हे लक्षात ठेव. माझ्या प्राप्तीच्या आड सिद्धींचं विघ्न उभं असतं हे तुला कळावे म्हणून मी सर्व सिद्धीचे सविस्तर स्वरूप पूर्णपणे सांगितले.
माझ्या ठिकाणी ध्यान धरले असता आणि मनाची एकाग्रता झाली असता तेथे साधक जर सुखोपभोगांच्या नादी लागला, तर सिद्धी त्या साधकाची लुबाडणूक करतात. सिद्धी योगाच्याद्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत्प्राप्ती, ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही.
जन्म, औषधी, मंत्र, तप इत्यादिकांनीही सिद्धी प्राप्त होतात. किंवा योगाभ्यास करताना प्राणापान साध्य झाले तरीही सर्व सिद्धी प्राप्त होतात. कित्येकांना जन्मतःच सहज सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, कोणी दिव्य वनस्पतींच्या साहाय्यानेच सिद्धी प्राप्त करून घेतात. कोणी तपादिक महान् साधने करून सिद्धी मिळवितात तर कोणी त्या मंत्रद्वारे साध्य करतात.
काही सिद्धी जन्मतःच प्राप्त होत असतात उदाहरणार्थ सर्पाला वायुभक्षण, मत्स्याला पाण्यात पोहणे, पक्ष्याला आकाशात उडणे, ह्या सिद्धी त्यांना जन्मल्यापासून आपोआप प्राप्त होत असतात. हंस हा पाणी आणि दूध वेगवेगळे करतो, कोकिळा मधुर स्वराने गायन करते, चकोर चंद्रामृताचे सेवन करतो ह्याही सिद्धी खरोखर त्यांना जन्मापासूनच प्राप्त झालेल्या असतात. आता काही दिव्यौषधींचे साधन केले असताही सिद्धी प्राप्त होत असतात, त्याही सांगतो ऐक. पांढऱया मांदाराच्या झाडाखाली गजाननाची पूजा करून अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास सर्व विद्यांचे ज्ञान होते व धनधान्याची समृद्धी होते. अजानवृक्षाची ओळख हीच की, त्याची फळे कुत्र्याच्या तोंडासारखी असतात. त्या वृक्षाचे दूध प्यावयास मिळाले तर तो मनुष्य अजरामर होतो.
कडूलिंब नित्य सेवन केले असता त्याला कोणतेही विष बाधत नाही. त्याला देहासंबंधी कोणतीच पीडा होत नाही. पूतिकावृक्षाच्या मुळामध्ये तर महासिद्धीची पुतळीच असते. ही साध्य केली असता साधक हा तत्काळ अप्सरांच्या घोळक्मयातच क्रीडा करू लागतो.
अशा औषधी अनंत आहेत आणि सिद्धीही अनंत आहेत. त्यांचे साधन होणेही खरोखर कठीणच आहे. आता हे बुद्धिमान् उद्धवा! तपादि सिद्धींचे विधी कसे असतात तेही ऐक. कृच्छ, पराक, चांद्रायण, इत्यादि व्रते करणे, पर्जन्याच्या धारात बसणे, पाण्यात उभे राहणे, धूम्रपानादी साधन करणे इत्यादी जी जी तपे आहेत ती मनामध्ये जी जी भावना धरून आचरण करावीत, ती ती सिद्धी त्याला प्राप्त होते. आता मंत्रसिद्धीचे लक्षण ऐक. आपण प्रेतावर बसून एक रात्र अनु÷ान केले असता प्रेतदेवता पूर्णपणे प्रसन्न होते. त्यामुळे भूत, भविष्य, वर्तमान अशा सर्व ज्ञानाची सिद्धी प्राप्त होते हे लक्षात ठेव. सूर्यमंत्राचे अनु÷ान केले असता दूरदर्शनसिद्धी प्राप्त होते.
जसा मंत्र आणि इच्छा असते, त्याप्रमाणेच त्याला सिद्धी प्राप्त होते. परंतु ह्या सर्व सिद्धींची समृद्धी एका योगधारणेमध्ये असते. दृढ आसन घालून प्राणापानांचे ऐक्मय करून जो योगधारणा करील, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मी सिद्धींची चमत्कारिक गोष्ट तुला सांगितली. आणखी एक ऐक, सदगुरु शिष्यावर बारीक लक्ष ठेऊन असतात योग्यवेळी ते त्याला सावध करतात आणि सिद्धीच्या मोहापासून दूर ठेवतात.
क्रमशः