केसरकर, पाटील, देसाई यांची नेमणूक, समन्वयासाठी करणार प्रयत्न
► प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांच्या तीन सदस्यीय मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली आहे. महाराष्ट्राकडून मंत्री चंद्रकांत पाटील, अबकारी मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तर कर्नाटककडून पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले व कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांची नेमणूक समितीवर करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 मंत्र्यांच्या नियुक्तीचे पत्र दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे. गृहमंत्र्यांच्या सहसचिवांनी दोन्ही राज्यांतील मंत्र्यांनी आपल्या वेळेनुसार बैठक घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय गृहखात्याकडे पाठवावा, अशा सूचना पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत होते. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. यामुळे या दोन्ही राज्यांमधील वाहतुकीवर परिणाम झाला. यादरम्यान अनेक दिवस दोन्ही राज्यांची बससेवाही बंद होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची संयुक्त बैठक पार पडली होती.