प्रतिनिधी/मुंबई
कर्नाटकव्याप्त सीमा भागातील मराठी भाषिकांवर लादलेली कन्नड सक्ती मोडून काढण्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला. त्यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल ठाकरे यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तरीही आपल्या मातफभाषेला तिष्ठत ठेवले आहे. आमची मराठी भिकारी नाही. शिवछत्रपतींची,हिंदवी स्वराज्याची भाषा भिकारी असू शकत नाही. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारण्याचा करंटेपणा करू नका. हा करंटेपणा महाराष्ट्र विसरणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी केंद्राला दिला.
विधानसभेत गेले दोन दिवस सुरू असलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले. दोन दिवस विरोधकांच्या सुरू असलेल्या आरोपांनाही त्यांनी दमदार भाषेत उत्तरे दिली.
भाषणाची सुरूवातच सीमाप्रश्नाने
भाषणाच्या सुरुवातीलाच ठाकरे यांनी सीमाप्रश्नाचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेळगाव – कारवार -निपाणी प्रश्नी पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. फडणवीस यांनी राजकीय विरोध विसरून ही भूमिका घेतल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल ठाकरे यांनी सीमावासीयांच्यावतीने फडणवीस यांचे आभार मानले. सीमाप्रश्नावर आपण सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्र येतो. आता सीमा भागात लादलेली कन्नड सक्ती दूर करण्यासाठी आपण कर्नाटक सरकारकडे जाऊ,असे ठाकरे यांनी सांगितले.
सावरकरांच्या भारतरत्नचा केंद्राला विसर
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून भाजपला उघडे पडले. फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात स्वातंर्त्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी दोनदा शिफारस करण्यात आली. परंतु पेंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. भारतरत्न देण्याचा निर्णय पंतप्रधान आणि पेंद्रीय सचिव समिती घेते. असे असताना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? असा सवाल त्यांनी केला.
औरंगाबादचे संभाजीनगर करणार
औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीवरूनही मुख्यमंर्त्यांनी विरोधी पक्षाला चांगलेच सुनावले. त्याचवेळी औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवूनही तो पेंद्राने का अडवून ठेवला आहे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका,असे भाजपला बजावले.
फडणवीस यांची दिलगिरी
उद्धव ठाकरे भाषण करत असताना भाजपच्या एका सदस्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला. त्याला संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेत्यांनी सदस्याला समज द्यावी, असे परब म्हणाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंर्त्यांचा एकेरी उल्लेख झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.