राज्याच्या सीमा खुल्या होऊन 23 दिवस उलटून गेले तरी गोवा राज्यातील स्थिती पूर्वपदावर येणे फारच कठीण बनले आहे. त्यातच देशी पर्यटकांचेही गोव्यात आगमन ही आरोग्याच्यादृष्टीने धोक्याची घंटा ठरली आहे.
गोवा राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. तसाच मृत्यूचाही आकडा वाढत आहे. अनेकांचे रोजगार बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही गोमंतकीय काळजी घेत आहेत तर काही लोक काळजी घेताना दिसत नाहीत. राज्याच्या सीमा खुल्या होऊन 23 दिवस उलटून गेले तरी गोवा राज्यातील स्थिती पूर्वपदावर येणे फारच कठीण बनले आहे. त्यातच देशी पर्यटकांचेही गोव्यात आगमन ही आरोग्याच्यादृष्टीने धोक्याची घंटा ठरली आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आता जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहेत. लक्षणे दिसताच लगेचच इस्पितळात जाऊन तपासणी करून घ्या, याबाबत हलगर्जीपणा करू नका, असे त्यांनी आवाहन केले आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही मेटाकुटीला आलेला आहे. ऑक्टोबर महिन्यात शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असले तरी गोव्यातील काही शैक्षणिक संस्थांनी दहावी, बारावीचे वर्ग स्वतःची जोखीम पत्करून सुरू केले आहेत. या धाडसी निर्णयाचे पालक कितपत स्वागत करतील, हे पहावे लागेल. गोव्याची मदार केवळ पर्यटन व खाण व्यवसायावरच, मात्र हे व्यवसाय संकटात सापडले आहेत. ते सुरळीत झाले, तरच गोव्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येणार आहे.
टाळेबंदी काळात ऊस शेतकऱयांचा प्रश्नही ऐरणीवर आला. राज्यात असलेला एकमेव साखर कारखाना सरकार बंद करणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऊस उत्पादकांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय ऊस उत्पादकांनी घेतला आहे. टाळेबंदीत अक्षरशः वीज व पाणी बिलाचा प्रश्न गाजला. कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या गोमंतकियांना वीज व पाणी बिले अव्वाच्या सव्वा आल्याने विरोधी पक्षनेत्यांनी आंदोलनेही छेडली. या बिलामध्ये थोडीफार सवलत देऊन सरकारला दिलासा द्यावा लागला. कोरोनाचे साम्राज्य एवढय़ात संपुष्टात येणार असे वाटत नाही. सध्यातरी बहुतांश गोमंतकीय तसेच येणारे पर्यटक कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करीत असताना दिसतात. सध्या राज्यात पडत असलेल्या पावसानेही कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी राज्यात ठिकठिकाणी भरविण्यात येणाऱया मासळी बाजारात कोरोना नियमांचे पालन न करण्याचा प्रकार घडत असतो. यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जे कोणी नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार स्थानिक पंचायतींना दिला आहे, मात्र त्यासंदर्भात कारवाई होताना दिसून येत नाही. राज्यातील आगामी पर्यटन व्यवसायही धोक्यात आहे. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्ववत आणण्यासाठी गोंयकारापुढे कठीण आव्हान आहे व हे आव्हान ते कितपत पेलतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्याचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी सीमा खुल्या झाल्यानंतर गोव्यात आता खुनी हल्ले, चोरीप्रकरणे, फसवणूक आदी गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. सुसंस्कृत गोव्याला हे निश्चितच शोभादायक नाही. राज्यातील गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला असला तरी यात ते कितपत यशस्वी होतात, हे पहावे लागेल.
पोलीस अधिकाऱयांना आवश्यक ते आदेशही त्यांनी याबाबतीत दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस यंत्रणाही यात कितपत यशस्वी होते, हेही पहावे लागेल. गोवा राज्यात ड्रग्ज प्रकरणानेही तोंड वर काढलेले असून यास गोमंतकीय युवावर्गही आधीन होत असल्याने हा चिंतेचा विषय बनलेला आहे. अमली पदार्थ व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी गोवा सरकार व संबंधित यंत्रणेपुढे आव्हान आहे.
सीमा खुल्या झाल्या असल्या तरी गोवा राज्यातील विविध ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणाऱया खासगी प्रवासी गाडय़ा बंद असल्याने प्रवासी वाहतूक कोलमडली आहे. पुरेसे प्रवासी नसल्याने बस चालविणे परवडणारे नसल्याने बहुतांश खासगी बससेवा बंद आहे. सध्या कदंब बससेवा त्यातल्या त्यात ग्रामीण भागात चालू असल्याने प्रवासीवर्गाची तात्पुरती सोय होत आहे. तोटय़ात बसगाडय़ा चालविणे अशक्य असल्याने खासगी बसमालक सध्या गोवा सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत आहेत.
सीमा खुल्या झाल्याने जीवाचा गोवा करण्यासाठी देशी पर्यटक सध्या गोव्याकडे वळलेले आहेत. जीवाचा गोवा करण्यासाठी येणाऱया या देशी पर्यटकांनी कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही भान ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. किनाऱयावर घोळका करून दाटीवाटीने उभे राहणे, मास्क न वापरणे आदी प्रकार घडत आहेत. उघडय़ावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याने सध्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे. या पर्यटकांमुळे स्थानिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. पोलिसांनी याबाबत कडक पावले उचलणे आवश्यक ठरते.
टाळेबंदीत गोवा राज्यातील काही रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. काही रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नसल्याने या मार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. सरकारने विनाकारण कुठेही वायफळ खर्च न करता प्रामुख्याने पाणी, वीज, रस्ते यावर भर देणे आवश्यक ठरते. गोवा हे सुंदर, सेबित राज्य म्हणून गणले जाते. कोरोनाच्या महामारीमुळे या राज्याचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी सरकारबरोबर संबंधित यंत्रणा तसेच गोमंतकीय जनतेने कार्यरत राहणे अत्यावश्यक ठरते. सध्या कोरोनामुळे दर दिवशी दगावणाऱयांची संख्या वाढत आहे ती शून्यावर आणण्यासाठी राज्य सरकार आता तत्पर झालेले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना जनतेनेही सहकार्य देणे आवश्यक ठरते.
–राजेश परब