वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सीमांवर निर्माण होणाऱया आव्हानांवर पहिल्यांदाच 3 दिवसीय चर्चासत्राचे आयोजन होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेत भारत स्वतःच्या सीमांवर विविध प्रकारच्या आव्हानांचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने पहिले राष्ट्रीय स्तरीय चर्चासत्र 8 नोव्हेंबरपासून सुरू करणार आहे. ही परिषद 8-10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
या चर्चासत्रात सद्यस्थितीतील योजनेसह मजबूत राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुधारणा विश्लेषण करण्यात येईल. या परिषदेत आयटीबीपी, सीआरपीएफ, एसएसबी, भारतीय तटरक्षक दल आणि विविध राज्य पोलीस विभागाचे अधिकारी भाग घेणार आहेत. बीएसएफची क्षमता वाढविणे आणि सुरक्षा दलांमधील ताळमेळ वाढविणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
काश्मीर खोऱयात घुसखोरांच्या विरोधात बीएसएफ कार्य करत आहे. ईशान्य भारतात दहशतवादविरोधी, ओडिशा-छत्तीसगड राज्यांमध्ये नक्षलविरोधी मोहीम आणि पाकिस्तान तसेच बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तपासणी नाक्यांच्या सुरक्षेसाठी बीएसएफ कार्यरत आहे. बीएसएफनेच या तीन दिवसीय चर्चासत्राच्या आयोजनाची घोषण केली आहे.
सद्यकाळात बीएसएफकडे 192 (3 एनडीआरएफसह) बटालियन आणि 7 बीएसएफ आर्टि रेजिमेंट असून त्या पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पहारा देत आहेत. सीमावर्ती क्षेत्रांमध्ये राहणाऱया लोकांदरम्यान सुरक्षेची भावना वाढविण्यासह सीमेवरील गुन्हे रोखण्याचे काम बीएसएफकडून केले जाते. याचबरोबर अवैध प्रवेशासह तस्करी रोखण्याची जबाबदारी बीएसएफकडे आहे.