सदस्यपदी हरविंदर सिंग यांचीही नियुक्ती
मुंबई / वृत्तसंस्था
माजी भारतीय फिरकीपटू सुनील जोशी यांची राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मदनलाल यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने जोशी यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केले. जोशी यांच्याशिवाय, माजी मध्यमगती गोलंदाज हरविंदर सिंग यांची पाच सदस्यीय निवड समितीत सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
मदनलाल, आरपी सिंग, सुलक्षणा नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीकडे या निवडीची जबाबदारी सोपवली गेली होती. सुनील जोशी मावळते अध्यक्ष एमएसके प्रसाद (दक्षिण विभाग) यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अर्थात, एका वर्षाच्या कालावधीनंतर क्रिकेट सल्लागार समिती निवड समितीच्या कामगिरीचा आढावा घेणार असून त्यानंतर ते आवश्यक सूचना करणार आहेत.
हरविंदर सिंग यांची मध्य विभागातून निवड झाली असून ते सदस्य म्हणून गगन खोडा यांची जागा घेतील. याशिवाय, निवड समितीत असलेल्या जतिन परांजपे (पश्चिम), देवांग गांधी (पूर्व) व शरणदीप सिंग (उत्तर) यांचा साधारणपणे वर्षभराचा कालावधी बाकी आहे.
जोशी आणि हरविंदर स्पष्टवक्ते आहेत. त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट असतो. त्यामुळे, आम्ही त्यांना प्राधान्य दिले आहे. विशेषतः जोशी यांनी बांगलादेश प्रशिक्षक पथकातून काम केले असल्याने त्या अनुभवाचा त्यांना लाभ होईल, असे मदनलाल वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. मदनलाल यांच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीने मुलाखतींसाठी 40 इच्छुकांमधून सुनील जोशी, हरविंदर, वेंकटेश प्रसाद, राजेश चौहान व शिवरामकृष्णन या 5 जणांना पाचारण केले होते.
आगरकर, मोंगियांना सप्टेंबरमध्ये संधी?
अजित आगरकर व नयन मोंगिया यांना तर मुलाखतीसाठीही बोलावले गेले नाही. पण, सप्टेंबरमध्ये जतिन परांजपे, देवांग गांधी व शरणदीप सिंग यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आगरकर व मोंगिया पुन्हा शर्यतीत असणार आहेत. दक्षिण विभागातून जोशी तर मध्य विभागातून हरविंदर यांची निवड झाल्याने बीसीसीआयचे कोटा पद्धतीला प्राधान्य असेल, हे देखील यामुळे स्पष्ट झाले. यापूर्वी एमएसके प्रसाद व गगन खोडा यांची नियुक्ती 2015 मध्ये झाली होती आणि मागील नोव्हेंबर महिन्यात त्यांना मुदतवाढही मिळाली होती.
49 वर्षीय जोशी यांनी 1996 ते 2001 या कालावधीत 15 कसोटी व 69 वनडे सामने खेळले असून त्यात अनुक्रमे 41 व 69 बळी घेतले आहेत. 42 वर्षीय हरविंदर यांनी 1998 ते 2001 या कालावधीत भारतीय संघातर्फे 3 कसोटी व 16 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 4 व 24 बळी घेतले. यापूर्वी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवाबद्दल सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. यंदाही क्रिकेट सल्लागार समितीने अन्य अनुभवी खेळाडूंच्या तुलनेत जोशी व हरविंदर यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
मदनलाल यांनी, या निवड प्रक्रियेत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आपले कोणतेही मत दिले नव्हते. निवडीसाठी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होते, असे स्पष्ट केले.