प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
राज्यातील शेतकऱयांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने कृषिखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी बार्से पंचायत क्षेत्रातील सुबदळे या भागातील अनुसूचित जमातींतील एकूण 18 शेतकऱयांना तणकापणी यंत्रांचे वाटप केले. यावेळी आपल्या भाषणात कवळेकर म्हणाले की, एक तणकापणी यंत्र हे पाच माणसांचे काम करते. तसेच शेतकऱयांनी हे यंत्र भाडेपट्टीवर दिल्यास त्यांची दिवसागणिक साधारणपणे अडीचशे रुपयांची तरी मिळकत होईल.
साधारण 18 हजार किमतीचे हे यंत्र आधी पूर्ण पैसे भरून शेतकऱयांना विकत घ्यावे लागायचे व मागाहून सवलतीसाठी अर्ज भरून सवलत प्राप्त करावी लागत असे. पण शेतकऱयांवरील ताण कमी करण्यासाठी आता यंत्र विकत घेतेवेळीच सवलत प्राप्त करून देण्यात येते. अनुसूचित जमातींतील शेतकऱयांना साधारण साडेतीन हजार रु. भरूनच हे यंत्र आता प्राप्त होते. यामुळे शेतकऱयांवरील भार कमी होण्यास मदत झाली आहे, याकडे कवळेकर यांनी लक्ष वेधले. राज्यात अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच केला गेला आहे, असे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले.
यंत्र भाडेपट्टीवरही देता येईल
आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवासाठी शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणे हे गरजेचे आहे. तसेच एक यंत्र भाडेपट्टीवर दिल्यास त्यातून जी मिळकत होईल तो शेतकऱयांचा फायदा आहे. तसेच इतरांची यंत्रे घेऊन त्यासाठी द्यावे लागणारे पैसे वाचतील, असे कवळेकर म्हणाले. यंदा काजू लागवडीसाठी रोपांवर अशाच प्रकारे सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे काजू लागवडीत वाढ झाली आहे. काजू बागायती वेळच्या वेळी साफ कराव्या लागतात. त्यासाठी ही यंत्रे कामी येतील. तसेच मनरेगा किंवा तत्सम योजनेंतर्गत पंचायती तणकापणी यंत्रे भाडेपट्टीवर घेतात. फावल्या वेळेत शेतकरी हेही काम करू शकतील, हे त्यांनी नजरेस आणून दिले.
यावेळी कृषी संचालक नेविल आफोंसो, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, उपसरपंच लक्ष्मण गावकर, पंच अर्जुन वेळीप, गावचे वेळीप खुशाली वेळीप व कृषी अधिकारी सत्यवान देसाई उपस्थित होते. खुशाली वेळीप, संचालक आफोंसो व जिल्हा पंचायत सदस्य वेळीप यांचीही भाषणे झाली.