सहकारी आणि शिष्य असलेल्या मल्लाच्या खून प्रकरणातील आरोपावरून ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार याला झालेल्या अटकेने भारतीय कुस्ती क्षेत्रातील वातावरण कलुषित झाल्याचे दिसून येते. कुस्ती हा अस्सल मराठी मातीतील क्रीडाप्रकार मानला जातो. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकीमध्ये भारताला प्रथम कुस्तीत पदक मिळवून दिले. मात्र, त्यानंतर भारताला पाच दशकांहून अधिक काळ पदकापासून दूर रहावे लागले. हा दुष्काळ कुणी संपवला असेल, तर सुशीलकुमार यानेच. 2008 ला बीजिंग ऑलिम्पकिमध्ये कांस्य, तर 2012 ला लंडन ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत त्याने पदकांचा दुष्काळ संपवला. त्यामुळे सुशीलकुमार भारतीयांच्या गळय़ातील ताईत होणे स्वाभाविकच. किंबहुना, उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी आयडॉल ठरणाऱया या जागतिक कीर्तीच्या मल्लास जागतिक कुस्तीदिनीच अटक व्हावी, हे सुशीलबरोबरच भारतीय कुस्तीकरिताही मानहानीकारक म्हणता येईल. घर रिकामी करून घेण्यासाठी सुशीलकुमार व त्याच्या सहकाऱयांनी राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर धनकड आणि त्याच्या मित्रांचे अपहरण करणे, नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये त्यांना बेदम मारहाण करणे, त्यात अत्यवस्थ झालेल्या सागरचा मृत्यू होणे, हे सगळेच अत्यंत धक्कादायक होय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला असून, गंभीर बाब म्हणजे आपला दबदबा वा दहशत निर्माण करण्यासाठी सुशीलकुमार यानेच या मारहाणीचा व्हीडिओ तयार केल्याची माहितीही समोर आली आहे. यात आपण निर्दोष आहोत, असा दावा सुशील वा त्याच्या समर्थक नि नातलगांनी कितीही केलेला असो, तसे असेल, तर 4 मेच्या त्या घटनेनंतर इतके दिवस त्याने गायब का व्हावे? अगदी फरार घोषित करून व लूक आउट नोटीस जारी करीत या खेळाडूस अटक करावी लागते ते पाहता त्यातून त्याचे निर्ढावलेपणच अधोरेखित होते. म्हणूनच या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी व्हायला हवी. तसे सुशीलकुमार व वाद हे जुने समीकरण आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील कामगिरी, प्रशिक्षक सतपाल यांच्या मुलीशी झालेला विवाह यामुळे वलयांकित ठरलेला सुशीलकुमार नंतरच्या काळात मैदानाबाहेरील कामगिरीमुळे अधिक गाजल्याचे पहायला मिळते. मीपणा, इगोमुळे अनेक कुस्तीपटू वा ज्युनिअर मल्ल यांच्यासोबत त्याचे सातत्याने खटके उडाल्याची अनेक उदाहरणे सापडतात. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारा योगेश्वर दत्तही छत्रसाल स्टेडियममध्ये सराव करत असे. मात्र सुशीलच्या जाचाला कंटाळून त्याने स्टेडिअमला राम राम ठोकल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याचे अन्य दोन मित्र तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या बजरंग पुनियानेदेखील त्याच्याशी न पटल्याने येथून काढता पाय घेतल्याचे सांगितले जाते. 2017 मध्ये कुस्तीपटू प्रवीण राणाला झालेल्या मारहाण प्रकरणातही त्याचे नाव पुढे आले होते नि याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआरआयसुद्धा दाखल झाला होता. कुस्ती हा ताकद, चापल्य व कौशल्याचा खेळ मानतात. तथापि, त्यात दांडगाई वर्ज्य असते. सुशीलने यातही आपण मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. 2019 मध्ये जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने कुस्तीपटू जितेंद्रच्या डोळय़ावर ठोसा लगावत त्याची करंगळी पिरगाळल्याची आठवण जुनी नाही. त्याच्या उद्धटपणा व हेकेखोरपणाचा प्रशिक्षक मंडळींनाही त्रास सोसावा लागल्याने त्यांनीही त्याच्यापासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून येईल. कोणत्याही खेळाडूची महानता केवळ त्याच्या भूतकाळातील कामगिरीवरच ठरत नाही. त्याच्यातील खिलाडूवृत्ती, नम्रता या गोष्टीही तितक्मयाच महत्त्वाच्या असतात. रिओ ऑलिम्पिकच्या निमित्ताने सुशीलमधील अखिलाडूपणा निश्चित उठून दिसला. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून त्याने माघार घेतल्याने नरसिंग यादवला या स्पर्धेकरिता पाठविण्यात आले. तेथे नरसिंगने सरशी साधत कोटा मिळविला खरा. मात्र आपण दोन पदके मिळविल्याने आपल्यालाच ऑलिम्पिकसाठी पाठविण्यात यावे, असा सुशीलचा हट्ट होता. त्यासाठी त्याने न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. मात्र, निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. दुसरीकडे डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या नरसिंगने सुशीलनेच आपण सराव करीत असलेल्या साई केंदातील अधिकाऱयांना हाताशी धरून जेवणात काहीतरी मिसळले, असा गंभीर आरोप केला होता. हे प्रकरण पुढे विस्मृतीत गेले असले, तरी त्यात काहीतरी काळे बेरे नव्हते ना, हा संशय कायम राहतो. आपण नाही, तर कुणीच नको, ही वृत्तीही त्यातून स्पष्टपणे दिसते. वास्तविक गुन्हेगारांशी असलेले त्याचे कथित संबंधही लपून राहिलेले नाहीत. आजवर या क्षेत्रातील वजन नि वलय यामुळे त्याच्या सगळय़ा गोष्टी खपून गेल्या असतील. परंतु, आताचा आरोप हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. भारतीय कुस्ती, या क्षेत्रातील एकाधिकारशाही, वशिलेबाजी, इतर कुस्तीपटूंना मिळणारी दुय्यम वागणूक अशा अनेक बाबींवर यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रकाश पडतो आहे. म्हणूनच या प्रकरणाची सर्व अंगांनी चौकशी व्हावी. सुशीलच्या जाचाला बळी पडलेल्या खेळाडूंनीही पुढे येऊन याकामी पोलिसांना सहकार्य करायला हवे. या प्रकरणामुळे सुशीलला रेल्वेने सेवेतून निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच. त्याची पदके, पुरस्कार काढून घेण्याची मागणीही होते आहे. कोणताही खेळाडू कितीही मोठा असला, तरी तो खेळ वा कायदा यापेक्षा कधीही मोठा नसतो. त्यामुळे तो दोषी आहे की निर्दोष, हे कायद्याच्या पातळीवर ठरणे, हेच श्रेयस्कर. अर्थात भारतीय खेळाडू म्हणतात त्याप्रमाणे सुशीलकुमारवरील आरोप खरे असतील, तर ते दुर्दैवी असेल. यशासोबत प्रसिद्धी, पैसा, सन्मान पचवावा लागतो. त्याची नशा चढली, की भल्याभल्यांची माती होते. कुस्तीत मोठे योगदान दिले असले, तरी आपल्या कर्माने सुशील आज आरोपीच्या पिंजऱयात आहे. आता तो सुशील आहे की कुशील, याचा निकाल कायदाच लावेल.
Previous Articleस्टुपिड नवरा, स्टुपिड बायको
Next Article मॉडर्नाची लस मुलांवर 100 टक्के प्रभावी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.