महाराष्ट्राच्या राजकारणात विविध संघटना व लहान-मोठे पक्ष ए टीम, बी टीम अशा भूमिका बजावत असल्याचा आरोप सुरु असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात आपला करेक्ट कार्यक्रम होतो आहे. कार्यक्रम पूर्ण होण्यापूर्वी कुस बदलूया अशी या मागची भूमिका असू शकते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे विविध प्रयोग करण्यात अग्रेसर असतात. कधी ते बारामतीत उपोषण करतात आणि राष्ट्रवादीला घाम फोडतात तर कधी किसान आंदोलन करुन मोदींना टार्गेट करतात. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे आंदोलन तंत्र त्यांनी आत्मसात पेले आहे. त्यामुळे राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणे यामागे कोणते राजकारण आहे हे समजून घेतले पाहिजे. पण त्यांचे हे बाहेर पडणे तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला महागात पडणार हे स्पष्ट आहे. हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत काय होणार याचा अंदाज सर्वांना आला होतो व तो सार्थ ठरला. स्वाभिमानीने महाविकास आघाडीशी फारकत घेताना स्वबळाचा नारा केला. जोडीला स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली. राजू शेट्टी यांनी शेतकऱयांना न्याय मिळत नाही. त्यांचे प्रश्न तडीस लागत नाहीत म्हणून महाविकास आघाडीला समर्थन दिले होते व रालोआशी पंगा घेत शरद पवार व राष्ट्रवादीच्या सहकार सम्राटांशी मैत्री केली होती. महाविकास आघाडीने त्यांना विधानपरिषदेचे आश्वासन दिले होते. पण महाविकास आघाडीच्या सत्तेला अडीच वर्षे झाली. ना आश्वासन पूर्ती झाली, ना शेतकरी हिताचा, न्याय मागण्याचा विचार. त्यामुळे संघटनेत अस्वस्थता होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उस उत्पादक शेतकऱयांच्या न्याय मागण्याही धुडकावल्या. एकरकमी एफआरपी दिली नाही. कृषी विम्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. राज्याच्या राजकारणात स्वाभिमानीला विश्वासात घेतले नाही. असा सारा संताप होता. जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांची आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याचा मनसुबा असल्याने राजू शेट्टी यांची राजकीय कोंडीही झाली होती. यासर्व पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी संघटनेची कार्यकारिणी बोलवून महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी दिली. अर्थात गेली अडीच वर्षे स्वाभिमानीचे महाविकास आघाडीशी एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे या सोडचिठ्ठीने महाविकास आघाडीत मोठी घालमेल वगैरे झालेली नाही. पण उद्याच्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून महाआघाडीचे शिवसेना उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने उभारणार आणि त्यांच्या विरोधी स्वबळावर राजू शेट्टी उभारणार असे आज घडीला चित्र आहे. भाजपा तेथे काय करणार हे बघायचे पण शेट्टीचा काडीमोड महाआघाडीची गणिते बदलणार असे सांगितले जात आहे. शरद जोशी यांनी जात, धर्म या पलिकडे आर्थिक प्रश्नावर शेतकऱयांचे संघटन साधत अंगार फुलवला होता. पण पुढे त्यांचे लहान-मोठे चेले आपआपली शेतकरी संघटना काढत संकुचित स्वार्थात शक्तीहिन होत गेले अथवा राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले. अनिल गोटे, विजय जांवधिया, पाशा पटेल, सदाभाऊ खोत अशी अनेक नावे सांगता येतील. राजू शेट्टी यांनी उसाचे आंदोलन चांगले तापवले होते. पण नंतर त्याची धग मंदावली. गेली दोन वर्षे कोरोना महामारी आणि अतिवृष्टी, महापूर यांची होती. या काळात सरकारने शेतकऱयांना आधार दिला नाही. दिवसा दहा तास शेतीसाठी वीजपुरवठा द्या ही मागणीही महाआघाडीने दुर्लक्षली. उसाला एकरकमी एफआरपी दिली गेली नाही. उलट एफआरपी दोन टप्प्यात देण्याची शिफारस महाविकास आघाडीने निती आयोगास केली. सरकार गरीबांसाठी काम करताना, शेतकऱयांना, ओबीसींना न्याय देताना दिसत नव्हते. ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांत सरकारमुळे अडचणीत आले आणि विमा कंपन्या शेतकऱयांना लुटत असताना सरकार डोळय़ावर पट्टी बांधून बसले आहे. या आणि अशा अनेक तक्रारी आहेत. राजू शेट्टी यांनी आता एकला चलो असा निर्णय घेतला आहे. त्यांचा सांगली, कोल्हापूर व राज्यातील अन्य भागात बरा-वाईट राजकीय प्रभाव पडणे शक्य आहे. राजू शेट्टींची स्वबळाची टीम कोणाची, ही टीम कोणाला उपयुक्त ठरते हे बघावे लागेल पण महाविकास आघाडीत जाऊन शेट्टी व समर्थक निराश झाले. तोंडघशी पडेल असे चित्र समोर आले आहे व ते शेतकरी हिताच्या दृष्टीने योग्य नाही. राजू शेट्टी आता केंद्र शासनाच्या विरोधात राज्यात हुंकार यात्रा काढणार आहेत. शेतकऱयांनी या यात्रेसाठी त्यांना निधी काढून नवी गाडी देण्याची घोषणा केली आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझन नेते व मंत्री यांच्या विरोधात मोहीम आखली आहे. शेतकरी संघटनेनेही मागे साखर कारखान्यातील भ्रष्टाचार कारखाने आजारी पाडून स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे विकत घेणे यावर टीका-टिप्पणी केली होती. राज्य बँकेतीलही गैरव्यवहार मांडला होता. मोदी सरकार विरोधीही बेरोजगारी व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी हे विषय घेऊन ते संतप्त आहेत. हुंकार यात्रेत यासर्व विषयांना फुंकर घातली जाईल. रविकांत तूपकर व देश पातळीवरील किसान मोर्चा सोबत राहून शेट्टी पुन्हा मैदानात संघर्ष करणार आहेत. पण या साऱया आंदोलनात शेतकरी हित खऱया अर्थाने साधल जाणार का? या प्रश्नाचे उत्तर नाही. कधी मोदी समवेत तर कधी शरद पवारांसमवेत जाऊन काय साधले यांचे उत्तर नाही. आता निर्णय झाला आहे व स्वबळाचा नाराही झाला आहे. यातून काय साधते हे बघावे लागले पण राजकीय प्रयोग करताना शेतकरी आंदोलन व शेतकरी मागण्या दुर्लक्षित होणार नाहीत यांची काळजी घेतली पाहिजे. राज्यातील काटामारी थांबली, हमीभाव मिळाला, विमा लाभ झाला आणि एकरकमी एफआरपी मिळाली तरी भरपूर झाले. यापुढे एखादी खासदारकी, आमदारकी तुच्छ आहे. शेतकरी हित हाच ध्यास व श्वास हवा. अन्यथा रोज नवे प्रयोग संघटना शक्तीहिन बनवतील.
Previous Articleमहाकवी कालिदासाचे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ (28)
Next Article रणवीर कपूरसोबत झळकणार रश्मिका मंदाना
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.