प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘सोन्याच्या पावलांनी…मोत्याच्या पावलांनी’ जिल्हाभरात गौराईचे आगमन झाले आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचा प्रभाव असला तरी येथील महिलांचा उत्साह लाडक्या गौराईला घरी आणण्यासाठी पूर्वीप्रमाणेच आहे. ज्येष्ठ महिलांच्या मार्गदर्शनाखाली पाणवठय़ावरून गौराई मातेचे घरी अगदी साधे पणाने पारंपारिकरित्या आगमन करण्यात आले.
कोकणात काही ठिकाणी पाच किंवा सात खडय़ांच्या तर काही ठिकाणी हळद व पत्रींच्या गौरी आणल्या जातात. गौराईला घरात घेण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या हातात किंवा मुलींच्या हातात या गौरी असतात, तिच्या पायावर पाणी ओतून मग हळदकुंकू लावून तिचे घरात स्वागत होते. एक ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा असे देखील म्हणतात. सुंदर मुखवटय़ांची गौर नव्या कोरी साडीचोळी, नथ, मंगळसूत्राने नटवण्यात येते. प्रत्येक ठिकाणी प्रथा परंपरा वेगळी असली तर त्या पाठीमागची महिला वर्गाची उत्कट भावना मात्र एकच आहे. मंगळवारी सर्वत्र गणरायाच्या ठिकाणी लाडक्या गौराईची महिलावर्गाने प्रतिष्ठापना केली.
या सजवण्यात आलेल्या गौराईला आज बुधवारी हवसण्यात येणार आहे. यावर्षी पूर्वा नक्षत्रात गौरी आल्या नसल्याने नवविवाहितांना ‘हौसे’ घेता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र आज या गौराईला परंपरेनुसार प्रसाद व पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. काही ठिकाणी गोडधोड तर काही ठिकाणी सामिष नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्यासाठी दरवर्षी नातेवाईक मंडळीही एकत्र येत असतात. माहेरवाशिणी घरी येतात. पण यावर्षी कोरोनामुळे नातेवाईकांच्या उपस्थित साजऱया होणाऱया उत्साहावर सोशल डिस्टन्सिंगमुळे बंधने आली आहेत. त्यामुळे घरातील मंडळीं व्यतिरिक्त या नैवेद्य भोजनाचा आस्वाद नातेवाईक, आप्तेष्ट मंडळींना लाभ घेता येणार नसल्याचे सांगितले जाते. या सणानिमित्त रंगणाऱया झिम्मा फुगडय़ा देखील यावेळी थांबणार आहेत.