प्रतिनिधी / करमाळा
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभा 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारून केलेली चूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, उमेदवारी न देताही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले नारायण पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेत त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीबाबत चर्चा केली. या वृत्ताला नारायण पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर नारायण पाटील यांनी पाच वर्षांत करमाळा विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे व त्यांचा जनसंपर्क पाहता 2019 च्या निवडणुकीत शिवसेना त्यांची उमेदवारी कापेल, असे स्वप्नात देखील कोणाला वाटत नव्हते. मात्र, तत्कालीन जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी ऐनवेळी रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणत करमाळ्याची उमेदवारी बहाल करण्यात आली.
शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर नारायण पाटील यांनी गेल्या विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीत अन्य पक्षाकडून ऑफर असतानाही पाटील यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. अपक्ष लढूनही त्यांना शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल यांच्यापेक्षा 25 हजार मते जास्त मिळाली. त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला, त्यांना 75 हजारांच्या घरात मते मिळाली. पाटील यांना झालेले मतदान पाहता शिवसेनेने उमेदवारी डावलून चूक केली, हे सर्वांच्याच लक्षात आले.
शिवसेनेकडून निवडणूक लढून पराभूत झालेले जिल्ह्यातील उमेदवार सोयीनुसार वागत असताना माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र शिवसेनेशी आपली नाळ तुटू दिली नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी आपली बाजू भक्कमपणे सांभाळून ठेवली. तसेच, त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील करमाळा ही एकमेव पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत विविध घडामोडी घडत असताना माजी आमदार नारायण पाटील यांना थेट मातोश्रीचा निरोप येणे, हा विषय तास चर्चेचा झाला आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत येऊन धनुष्यबाणावर निवडणूक लढलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी सोयीनुसार वागत आहेत. काही पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे असल्याने त्यांच्या ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे चकरा वाढल्या आहेत.
तसे पाहिले तर सर्वच आयत्या वेळेचे शिवसेनेचे उमेदवार आज शिवसेनेपासून चार हात दूर असल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी डावलूनदेखील नारायण पाटील हे मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले, याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवून पाटील यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीसाठी चर्चा केल्याची माहिती आहे. या वृत्ताला पाटील यांनी दुजोरा दिला आहे.