प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर संपूर्ण वर्ष कोरोनाशी लढण्यातच गेले. आता कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. वर्षभर कोरोनात गेले असले तरी कर्जमाफी, नुकसान भरपाई, कोरोनावर मात करणे, लसीकरण अशा विविध कामावर लक्ष केंद्रीत करून काम केले आहे. या सर्व कामात सोलापूर शहर जिल्ह्याने चांगली साथ दिली आहे. लवकरच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास व्यक्त करून पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगती करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यावर भर राहील, असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी म्हटले आहे.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कार्यकालास वर्षपूर्ती झाल्यानिमित्त वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
शंभरकर म्हणाले, सोलापुरात आपण 20 जानेवारी 2020 रोजी सुरू झालो. त्यानंतर काही काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. 12 एप्रिलला आपल्याकडे पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर रूग्ण सापडत राहिले. जूनमध्ये आपल्या अधिक रूग्ण आढळत होते. सुरूवातीला शहरामध्ये अधिक रूग्ण सापडत होते. त्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक रूग्ण आढळून येऊ लागले. पण अशा परिस्थितीतही सर्व नागरिकांनी सहकार्य केले आहे. सुरूवातीला शहरातील खाजगी हॉस्पिटलमधून रूग्ण घेण्याबाबत काही प्रमाणात अडचण निर्माण झाली खरी. मात्र सातत्याने डॉक्टरांशी चर्चा करून, नियमावली दाखवत आणि सामंजस्याने चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यात यशस्वी झालो.
या काळात शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय अशा संस्थांची चांगली मदत झाली. जेवण असो, अन्न धान्य पुरविणे असो अशा अनेक स्तरावर या संस्थांनी कोरोनावर मात करण्यास आणि नागरिकांना सहकार्य करण्यास तत्परता दाखवली होती. सुरूवातीला कोरोनाबाबत नेमके काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडत होता. जसजसे त्याची तीव्रता लक्षात येऊ लागली आणि उपचारामध्येही अनुभवाने अनेक गोष्टी समोर येत होत्या. त्याप्रमाणे बदल होत गेले सरकारकडून सातत्याने नवनवीन येणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करीत गेलो. त्यामुळे आता सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण आहोत. लसीकरण सुरू झाले आहे. लस ही ऐच्छिक आहे. तरीही सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लसीकरणाचे काम अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे, तसेच आगामी काळात केळी, डाळिंबाची निर्यात ज्वारी या विषयावर आपण अधिक काम करू
अजून काय म्हणाले, जिल्हाधिकारी
- आतापर्यंत 98 टक्के लाभार्थ्यांना कर्ज माफी मिळाली आहे.
- खरीपासाठीचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट 1 हजार 468 कोटी होते. त्याऐवजी जिल्ह्यात 1 हजार 601 कोटी रूपये कर्ज वाटप करून उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्ज वाटप झाले.
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 3 लाख 95 हजार क्षेत्राला नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू
-अतिवृष्टी काळात 25 रेस्क्यू बोट मागवून सुमारे 200 पेक्षाही अधिक जणांचे प्राण वाचविले - वाळू टेंडर प्रक्रिया सुरू असून मार्चमध्ये वाळू लिलाव सुरू होण्याची शक्यता
- किसान सन्मान योजनेत बोगस लाभार्थ्यांकडून आतापर्यंत 5 कोटी रुपये वसूलमहसूल भवन साठी 6 कोटीचा निधी आवश्यक असून यंदाच्या वर्षी नवीन महसूल भवन सुरू होईल.