रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी, शाळा, महाविद्यालय ही राहणार बंद, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
प्रतिनिधी / सोलापूर
इतर राज्यात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा कमी आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून खबरदारीसाठी 25 फेब्रुवारीपासून 7 मार्च पर्यत रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सात रस्ता येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, विविध विभागातील अधिकाऱ्यांसमवेत कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे यांनी रात्रीची संचारबंदीची घोषणा केली.
राज्यामधील अनेक जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरची परिस्थिती चांगली आहे. मात्र पूर्वी अचानक सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाला होता. यामुळे शहर जिल्ह्याला मोठा त्रास झाला. नागरिकांच्या काळजीसाठी व कोरोनाचे प्रमाण वाढू नये म्हणून रात्रीची संचारबंदी घोषित केली आहे. नागरिकांना आता खूप काळजी घ्यावी लागेल. चाचणी वाढवण्यावर भर द्या, टेस्टिंग, ट्रीटमेंट, ट्रेसिंग या त्रिसूत्रीवर काम करण्यावर सूचना दिल्या आहेत. आरटीपीसीआर चाचणीवर भर, कोव्हिडं केअर सेंटर सज्ज ठेवा अशा सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 58 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के लसीकरण झाले आणखी लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिली आहे.
कर्नाटक, आंध्रामधून सोलापुरात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यातून आलेल्या नागरिकांना जर सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटिव्ह टेस्टचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. कोरोनाचे प्रमाणपत्र नसल्यास सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. येत्या दोन दिवसापासून हे आदेश लागू होणार असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.