तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बार्शी तालुक्यातील चुम्ब या गावातील अविनाश भीमराव जाधवर यांनी उज्वल यश प्राप्त केले असून ऑल इंडिया रँकिंगमध्ये त्यांचा 433 वा नंबर आला आहे.
अविनाश जाधवर हे शेतकरी पुत्र असून अतिशय हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादित केले आहे. अगदी तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली असून त्यांना शासकीय उच्च अधिकारी सेवेत जाण्याचे स्वप्न लहानपणापासून होते त्यांनी ते अतिशय चिकाटी यातून आणि जिद्दीतून आज पूर्ण करून दाखविले.
अविनाश भीमराव जाधवर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंब येथे झाले असून माध्यमिक शिक्षण भगवान बाबा विद्यालय चुंब येथे झालेले आहे. अविनाश जाधवर यांची बीएससी ऍग्री पुणे येथे झालेली असून एम एस सी ऍग्री कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेले आहे. अविनाश जाधवर यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा त्यांचे मोठे बंधू जनार्दन भीमराव जाधवर यांचा आहे ते व्यवसायाने वकील आहे. अविनाश दिल्लीमध्ये शिकत असताना एक वेळ स्वतः उपाशी राहून भावाला आर्थिक आणि मानसिक रुपी मदत पुरवली आहे.
अविनाश जाधवर यांचे वाडीक तवडील शेतकरी असून शेतीबरोबरच उदरनिर्वाहासाठी मुलांच्या शिक्षणासाठी धान्य मळणी मशीन रात्रंदिवस चालवित आहेत. परिस्थिती बेताची असताना सुद्धा अविनाश यांनी जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर आज घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. जाधवर यांनी चुंब या गावाबरोबरच बार्शी तालुक्याचे नाव देशात रोशन केले आहे याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या जिद्दीला आणि चिकाटी चा आदर्श आमच्या गावातील आणि तालुक्यातील इतर विद्यार्थी घेतील असा विश्वास वाटतो. अशी प्रतिक्रिया चुंब या गावचे सरपंच अशोक जाधवर यांनी तरुण भारत संवाद शी बोलताना दिली.