पत्रकार परिषदेत सौहार्द फेडरेशनचे चेअरमन बी. एच. कृष्णारेड्डी यांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
सहकार क्षेत्रामुळे आतापर्यंत देशाचा विकास होत आला आहे. सहकार क्षेत्र मजबूत राहिले तर देशाची आणि राज्याची प्रगती होवू शकते. यासाठीच सरकारने सहकार क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले आहे. सौहार्द सोसायटींनाही सहकार क्षेत्राचा कायदा लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याला बऱयापैकी यश आले असून भविष्यात सहकार क्षेत्राला त्याचा फायदा होणार असल्याची माहिती, कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष बी. एच. कृष्णारेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ, संचालक लक्ष्मण पवार, सहकार भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य आणि इराण्णा कोप्पद हे उपस्थित होते.
कृष्णारेड्डी म्हणाले, राज्यामध्ये एकूण 5 हजार 600 सौहार्द सोसायटय़ा आहेत. त्या माध्यमातून 50 हजार तरुणांना उद्योग मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या करामुळे मोठी समस्या सौहार्द सोसायटय़ांना निर्माण झाली आहे. तो कर कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी निश्चितच याबाबत पाऊल उचलू, असे आश्वासन दिले आहे.
सौहार्द सोसायटीमध्ये ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टास्कफोर्स कमिटी नेमणूक करण्यात आली आहे. त्या कमिटी अंतर्गत या सोसायटींवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे चेअरमन बी. एच. कृष्णारेड्डी यांनी सांगितले. काही सोसायटय़ांच्या गलथान कारभारामुळे इतरांना त्याचा धोका निर्माण होत असल्याने ही टास्कफोर्स कमिटी नियुक्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सौहार्द फेडरेशनच्या माध्यमातून आता या सोसायटींच्या समस्या दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना काळात वसुली तसेच इतर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. तरी देखील समस्यांना सोसायटय़ांनी तोंड देत प्रगती साधली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमधून सर्वसामान्य जनतेला कर्ज मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही सहकार क्षेत्रातील संस्थांकडेच कर्जासाठी अर्ज करत असतात. त्यांना वेळेत आणि तातडीने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे काम या सोसायटय़ा करत आल्या आहेत. तसेच यापुढेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.