प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात समस्या तशाच आहेत. मागचे प्रकल्प अजून पूर्ण नाहीत. कचरा तसाच पडलेला आहे. चार भिंतीवर लाईट नाही. अजिंक्यताऱयाचा रस्ता अर्धवट आहे. अर्धवट ठेवलेल्या कामांच्या निषेधार्थ सातारा पालिकेला श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने चार भिंतीवर केला. कंदिल लावून विकास कुठे आहे, तो कोणाला दिसला आहे का?, अशी विचारणाही सातारकरांना शिवसैनिकांनी केली.
साताऱयात चारभिंतीच्या ठिकाणी शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, अभिजीत सपकाळ, विभाग प्रमुख अमोल खुडे, शाखा प्रमुख संतोष खुडे, अमोल खोपडे, प्रथम बाबर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहर प्रमुख निलेश मोरे म्हणाले, सातारा शहरात जेव्हा पालिकेचे इलेक्शन सुरु होते, त्याच्या आधी सहा महिने आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते जागे होतात. नारळ फोडून दाखवतात. नारळ फुटलेला असतो तो बरोबर आहे परंतु तो पूर्णत्वास गेलेला आम्ही कधी पाहिले नाही. विकास कुठे राहिला आहे तेच शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.
गणेश अहिवळे म्हणाले, गेली 30 वर्ष सातारा जिल्हा इतर जिह्याच्या तुलनेत मागासलेला आहे. आपल्या विकासकामांच्या नावाखाली नुसते नारळ फोडले जातात. परंतु विकास मात्र, प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. कित्येक वर्षापासून चारभिंतीचा प्रश्न तसाच राहिलेला आहे. लाईट नाही, सुविधा नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. येथे येणारा नागरिक काय करतो हे कळत नाही. येथील हुतात्मा स्मारकाकडे दुर्लक्ष आहे. अजिंक्यताऱयाचा रस्ता तसाच पडला आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी 25 लाख रुपये नाहीत. तुम्ही म्हणताय की रोप वे करुन साताऱयाचा विकास करु. म्हणजे सातारकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहात. इलेक्शन आले की तुम्ही नारळ फोडता. लोकांच्यासमोर दिखावा करता, एवढी कामे केली तेवढी केली. साडे चार वर्षात कुठेही विकासकामे पूर्ण झाल्याचे दिसत नाही. बास झालं तुमचा ढोंगीपणा. मागच्या पंचवार्षिकला तुमच्या जाहीरनाम्यात भुयारी गटर योजना होती. ती अद्याप अपूर्णच आहे. त्रिशंकू भागात कचऱयाचा प्रश्न तसाच पडलेला आहे. उपनगराध्यक्षांनी सांगितले की 30 कर्मचारी आणि घंटागाडय़ा शाहुनगर भागात वाढवतो. परंतु ते कधी अंमलात येणार आहे. दहा दिवसांतून एकदाच कचऱयाची गाडी येते. नागरिक आजारी पडताहेत याच गांभीर्य पालिकेला नाही, असा आरोप मोरे यांनी केला.