भारतीय संस्कृतीत ‘राम’ हा आदर्शांचा आदर्श मानला जातो. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी अशी अनेक विशेषणे त्याला लावली जातात. पण जनमानसातील आपले हे स्थान शाश्वत ठेवण्यासाठी श्रीरामांना आपल्या जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. त्यासाठी अनेकदा लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. पण सत्य, संयम आणि मनाची एकाग्रता, शुद्धता त्यांनी कायम जपली. निरंतर जनहिताचाच विचार केला. त्यासाठी त्यांना कधी 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला, तर कधी प्रिय पत्नी सीतेचा त्यागही करावा लागला. पण आपल्या तत्त्वांपासून श्रीराम कधीही ढळले नाहीत. म्हणूनच हजारो वर्षानंतरही भारतीय लोकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ आहे. या स्थानाचा महिमा अनेक कवींनी वर्णन केला आहे. कोणतीही गोष्ट आपले स्थान सोडून दुसरीकडे गेली की ती शोभत नाही. तसेच त्या गोष्टीची निंदाही होते. आता हाच एक श्लोक पहा ना !
राजा कुलवधूर्विप्रा मत्रिणश्च पयोधरा:।स्थानहीना न शोभन्ते दन्ता: केशा: नखा:नरा:।।
अर्थ-राजा, कुलवधू ,ब्राह्मण, मंत्री आणि ढग हे आपले स्थान सोडून गेल्यास शोभून दिसत नाहीत ज्याप्रमाणे दात, केस नखे आणि माणसे आपले स्थान सोडून गेल्यास शोभून दिसत नाहीत. प्रजाहितदक्ष राजा असो, घराण्याची शान असणारी सून असो, लोकांना विद्या, ज्ञान देणारा ब्राह्मण असो, योग्य सल्ला देण्यासाठी नेमलेला मंत्री असो किंवा पाऊस पडणारे ढग असोत, त्यांनी जर आपल्या मर्यादा पाळल्या नाहीत, योग्य ते कर्तव्य बजावले नाही, तर त्यांची समाजात निंदा होते. तोंडात दात नसले, डोक्मयावर केस नसले, नखे नसली तर अशी माणसे शोभून दिसत नाहीत. लोकांच्या चेष्टेचा विषय होतात. म्हणून प्रत्येकाने आपले समाजातले स्थान सांभाळले पाहिजे.
स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ता: केशा: नखा: नरा:।
इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानम् न परित्यज्येत्।।
अर्थ – स्वतःची जागा सोडून गेलेले दात, दात, केस, नखे आणि माणसे शोभून दिसत नाहीत. हेच जाणून बुद्धिमान माणसाने स्वतःचे स्थान कधीही सोडू नये. वरील सुभाषितात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची थोडी अदलाबदल झाली आहे. येथे पूर्वार्धात जागा सोडून गेलेल्या गोष्टी शोभून दिसत नाहीत, हे जाणून शहाण्या माणसाने समाजातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी कधी खालच्या पातळीवर जाऊन वागू नये असे सांगण्याचा या श्लोकात उद्देश आहे. म्हणजेच स्थान या शब्दाचा अर्थ इथे आपला स्तर, मान, पातळी, सन्मान अशा विविध छटा दाखवणारा आहे. एखाद्या वस्तुची जागा इतपत मर्यादित नाही. वरवर साधे वाटणारे हे श्लोक अंतर्मुख करायला लावणारे आहेत.