क्रिकेटमधला विचारवंत…अश्विन!
एखाद्या खेळाडूची फलंदाजीतील सरासरी ही त्याच्या गोलंदाजीपेक्षा जास्त चांगली असेल, तर तो एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मानला जातो…‘आयसीसी’च्या अष्टपैलू खेळाडूंसाठीच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाच्या खालोखाल दुसऱया स्थानावर असलेला रविचंद्रन अश्विन या गटात फिट बसतो. त्याची ऑफस्पिन गोलंदाजीच नव्हे, तर भक्कम फलंदाजीही अनेकदा कठीण प्रसंगी भारताच्या मदतीला आलीय…
निल कुंबळे, हरभजन सिंग यांच्यानंतरचा भारतीय फिरकी गोलंदाज कोण म्हटल्यावर नाव येईल ते रविचंद्रन अश्विनचंच…स्पष्टपणे आपली मतं मांडण्यास न कचरणाऱया अन् त्यामुळं अनेकदा वादाचं मोहोळ उठवून जाणाऱया अश्विनची कधीही हार न मानण्याची वृत्ती त्याला गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही विकसित करण्याकामी मोलाची मदत करून गेलीय…अतिविचार करणारा म्हणून ओळखल्या जाणाऱया या खेळाडूसाठी क्रिकेट हा जणू बुद्धिबळाचा खेळ. त्यामुळंच अनेक विश्लेषक त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम ‘विचारवंत’ मानतात…
अश्विनची ही हुशारी खूप आधी दिसू लागली होती. त्यामुळंच चेन्नईमध्ये 17 सप्टेंबर, 1986 रोजी जन्मलेल्या या खेळाडूला फक्त 12 वर्षांचा असूनही त्याचे बालपणीचे प्रशिक्षक चंद्रशेखर राव हे स्वतःसाठी क्षेत्ररक्षण लावण्यास सांगायचे…एक वेगवान गोलंदाज म्हणून सुरुवात केलेल्या रविचंद्रन अश्विननं पुढं स्वतःला ऑफस्पिनर बनवलं. जेव्हा रणजी चषक स्पर्धेतील पदार्पणातच त्यानं सहा बळी घेतले त्यावेळी तो महाविद्यालयात तिसऱया वर्षात शिकत होता. मात्र मैदानाप्रमाणं शिक्षणातही आपण कमी पडणार नाही याची त्यानं व्यवस्थित काळजी घेतली…
2010 च्या ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील जोरदार प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अश्विननं त्या वर्षी जूनमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच आंतरराष्ट्रीय मोहिमेत भारत श्रीलंकेविरुद्ध पराभूत होण्याच्या मार्गावर असताना शतकवीर दिनेश चंडिमलचा ‘कॅरम बॉल’वर बळी घेऊन त्यानं आपली चुणूक दाखवली. पुढच्या वर्षी 9 बळी घेऊन पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो फक्त तिसरा भारतीय बनला. तेव्हापासून आतापर्यंतच्या वाटचालीत रविचंद्रन अश्विननं स्वतःला भारताच्या महान अष्टपैलूंपैकी एक म्हणून व्यवस्थित सिद्ध केलंय…
कसोटीत अश्विनची फलंदाजीतील 27.46 सरासरी ही न्यूझीलंडचा महान अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडली यांच्याइतकी, तर त्याच्या नावावरील शतकांची संख्या (5) ही वासिम जाफर आणि विनू मांकड यांच्याशी बरोबरी करणारी अन् सलामीवीर संजय माजरेकर आणि संदीप पाटील (प्रत्येकी 4) यांच्यापेक्षा जास्त. एम. एस. धोनीला गाठण्यासाठी त्याला गरज आहे ती केवळ एका शतकाची…
भारताच्या 500 हून जास्त आंतरराष्ट्रीय बळी मिळविलेल्या खेळाडूंमध्ये अश्विननं कपिल देव यांच्या मागोमाग दुसऱया क्रमांकाच्या धावा केल्या आहेत, तर जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक बळी मिळविणाऱया आणि 3000 हून जास्त धावा करणाऱया सहा क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये त्याचं नाव झळकतंय…सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अश्विननं कसोटीत शतक आणि एका डावात पाच बळी अशी दुर्मिळ अष्टपैलू कामगिरी तीन वेळा केलीय. त्यापैकी दोनदा वेस्ट इंडिजविरुद्ध अन् एकदा इंग्लंडविरुद्ध. याबाबतीत त्याच्याहून पुढं आहेत ते फक्त दिग्गज इयान बोथम (पाच वेळा) !
डावखुऱया फलंदाजांचा कर्दनकाळ…
रविचंद्रन अश्विनच्या खात्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात डावखुऱया फलंदाजांचे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम विसावलेला असून त्यानं 168 डावांत 234 बळी घेतलेत. त्याच्या मागं दुसऱया क्रमांकावर आहे तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (316 डावात 211 बळी)…
डावखुऱया फलंदाजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलियाला अश्विनची सदोदित धास्ती वाटतेय ती त्यामुळंच…सध्या चालू असलेल्या मालिकेतील त्याचा जबरदस्त फॉर्म पाहिल्यास ती किती सार्थ आहे ते कळून चुकतंय. या भारतीय ऑफस्पिनरनं नागपूर कसोटीत 8 आणि त्यानंतर दिल्लीत 6 असे 14 बळी घेतलेत…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 बळी मिळविणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरण्याचा पराक्रमही अश्विननं बजावलाय. त्याला यासाठी 20 लढती लागल्या. कुंबळेनं तितक्याच कसोटींत मिळविले ते 111 बळी…अश्विनची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे ती इंग्लंडविरुद्ध (19 कसोटींत 88 बळी). त्यापाठोपाठ न्यूझीलंड (9 लढतींत 66 बळी) अन् श्ा़खाrलंकेचा (11 सामन्यांत 62 बळी) क्रमांक…
कसोटीत सर्वांत जलदरीत्या 450 बळी मिळविणारा भारतीय गोलंदाज ठरण्याचा मान त्याला प्राप्त होतो. अश्विननं ही कामगिरी केली ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला 89 सामने लागले…450 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा अश्विन हा फक्त नववा गोलंदाज अन् अनिल कुंबळेनंतरचा (619) दुसरा भारतीय खेळाडू…
अश्विन-जडेजा…घातक जोडी !
- ऑस्ट्रेलियाला चांगलीच पिडणारी अश्विन नि जडेजा ही जगातील दुसरी सर्वोत्तम फिरकी जोडी बनलीय. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील दोन कसोटींमध्ये त्यांनी एकूण 31 बळी घेतलेत. त्यासरशी दोघांनी डिसेंबर, 2012 मधील इंग्लंडविरुद्धच्या नागपूर लढतीपासून 45 कसोटींमध्ये एकत्र खेळताना घेतलेल्या बळींची संख्या पोहोचलीय 462 वर. यात अश्विनच्या नावावर 248, तर जडेजाच्या खात्यात 214 बळी. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी जोडीच्या स्थानावर विराजमान आहे ती 54 कसोटींत 501 बळी घेणारी कुंबळे (281 बळी) व हरभजन (220 बळी) दुक्कल…
- भारतीय उपखंडात तर अश्विन-जडेजा ही जोडी प्रचंड घातक ठरलीय. ते एकत्र खेळलेल्या 45 पैकी 34 सामन्यांमध्ये भारतानं विजय मिळवलेला असून त्यात अश्विननं 213, तर जडेजानं 174 बळी मिळविलेत. या 34 पैकी 30 विजय नोंदले गेलेत ते भारतात…
फिटनेस नि डाएट…
- ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान रविचंद्रन अश्विननं त्याच्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेऊन 7 ते 8 किलो वजन घटवलं अन् त्याच्या शब्दांत सांगायचं झाल्यास वय वाढत चाललेलं शरीर पुढील 3-4 वर्षांसाठी तयार केलं…
- चेन्नईत असताना आपल्या कुत्र्यांना घेऊन रात्रीच्या वेळी फिरण्यास जाण्याचा क्रम न चुकविणारा अन् चित्रपटांची विलक्षण आवड असलेला अश्विन हा मांसाहाराचा फार मोठा चाहता नाही…
- अश्विन मुळात पक्का शाकाहारी. पौष्टिकतेचा विचार करून त्यानं चिकन आणि अंडी खाण्याचा प्रयत्न केला खरा. तथापि तो चिकन खाणं सुरू ठेवू शकलेला नाही, मात्र नियमितपणे अंडी खातो…
- अश्विनला त्याची आई त्याच्यासाठी जे खाद्य तयार करते ते आवडतं आणि ‘पनीर कॅप्सिकम’ हा त्याचा सर्वांत आवडता पदार्थ…
अश्विनची गोलंदाजी…
प्रकार | सामने | डाव | बळी | डावात उत्कृष्ट | सामन्यात उत्कृष्ट | सरासरी | 5 बळी | 10 बळी |
कसोटी | 90 | 170 | 463 | 59 धावांत 7 बळी | 140 धावांत 13 बळी | 23.98 | 31 | 7 |
वनडे | 113 | 111 | 151 | – | 25 धावांत 4 बळी | 33.49 | – | – |
टी20 | 65 | 65 | 72 | – | 8 धावांत 4 बळी | 23.22 | – | – |
फलंदाजीतील कामगिरी…
प्रकार | सामने | डाव | नाबाद | धावा | सर्वोत्क्=ष्ट | सरासरी | शतकं | अर्धशतकं |
कसोटी | 90 | 128 | 15 | 3103 | 124 | 27.46 | 5 | 13 |
वनडे | 113 | 63 | 20 | 707 | 65 | 16.44 | – | 1 |
टी20 | 65 | 19 | 12 | 184 | नाबाद 31 | 26.28 | – | – |
खेळ जुनाच ओळख नवी : स्नूकर
- भारत आणि चीनमधील वाढीमुळं स्नूकर हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळांपैकी एक अन् ‘स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप’ ही वर्षातील सर्वांत मोठय़ा क्रीडास्पर्धांपैकी एक बनलीय. ‘बिलियर्ड्स’ या दुसऱया ‘क्यू स्पोर्ट्स’मधून त्याचा विकास झाला…19 व्या शतकाच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या या खेळाची पहिली अधिकृत स्पर्धा 1916 मध्ये, तर 1927 साली पहिली जागतिक स्पर्धा खेळली गेली. तेव्हापासून ‘स्नूकर’ची लोकप्रियता वाढत चाललीय. 70 व 80 चं दशक हे या खेळाचं सर्वोत्तम युग मानलं जातं…
- ‘स्नूकर’मध्ये पांढरा ‘क्यू बॉल’ वापरून इतर चेंडू योग्य क्रमाने पॉकेटमध्ये ढकलायचे असतात आणि ‘प्रेम’ जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. ‘प्रेम’ म्हणजे वैयक्तिक सामना…
- स्नूकर एक विरुद्ध एक खेळाडू अशा प्रकारे खेळला जातो आणि टेबल आयताकृती 12 फूटƒ6 फूट आकाराचे, तर 3 फूटपेक्षा कमी उंचीचे असते. टेबलवर सहा पॉकेट्स असतात, प्रत्येक कोपऱयात एक आणि दोन लांब बाजूंच्या मध्यभागी प्रत्येकी एक…
फिनोलिक रेजिनपासून बनवलेले चेंडू अंदाजे 2.7 इंच व्यासाचे असतात. 15 लाल चेंडू आणि प्रत्येकी एक काळा, गुलाबी, निळा, तपकिरी, हिरवा आणि पिवळय़ा रंगाचा चेंडू तसेच एक पांढरा ‘क्यू बॉल’ असतो…- पांढऱया चेंडूला ढकलण्यासाठी खेळाडू सामान्यतः लाकडापासून बनवलेल्या ‘क्यू’चा म्हणजेच काठीचा वापर करतात. ती 3 फूटपेक्षा कमी लांबाची नसते…
- खेळाडूला लाल रंगाचा चेंडू पॉकेटमध्ये टाकल्यास एक गुण मिळतो. त्यानंतर त्याने त्याच्या पुढील शॉटसाठी वेगळय़ा रंगातील चेंडूची निवड करणे आवश्यक असते. काळा चेंडू पॉकेटमध्ये टाकल्यास सर्वाधिक सात गुण मिळतात, तर गुलाबी चेंडू सहा, निळा पाच, तपकिरी चार, हिरवा तीन आणि पिवळा चेंडू दोन गुण देऊन जातो…
- प्रत्येक रंगाचा चेंडू पॉकेटमध्ये टाकल्यानंतर खेळाडू (सहा रंगातील चेंडू पुन्हा आणून ठेवले जातात, परंतु लाल चेंडू ठेवले जात नाहीत) लाल रंगाचा चेंडू पॉकेटमध्ये टाकतो. हा क्रम सर्व लाल रंगाचे चेंडू संपेपर्यंत चालतो. राहिलेल्या सहा रंगांतील चेंडू चढत्या गुणांच्या क्रमाने पॉकेटमध्ये ढकलले जातात. अशा प्रकारे काळ्या रंगाचा चेंडू शेवटी ढकलला जातो…
- जोपर्यंत चेंडू चुकत नाही किंवा फाऊल होत नाही तोपर्यंत खेळाडचे खेळणे चालू राहते. त्यानंतर आळीपाळीने खेळाडू खेळतात. जर एखाद्या खेळाडूने ‘फाऊल’ केले, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण दिले जातात. मात्र निळा, गुलाबी किंवा काळा चेंडू ढकलताना ‘फाऊल’ झाले किंवा अधिक गुणांच्या चेंडूंपैकी एकाला आधी ढकलले, तर अशा स्थितीत ‘फाऊल’मुळे चेंडूच्या मूल्याइतके गुण मिळतात…
– राजू प्रभू