प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे दक्षिण विभागात स्मार्टसिटीची कामे व्यवस्थित झाल्याचा दावा करण्यात आला असून दुसरीकडे उत्तर विभागातील कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधीनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केल्या. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र सदर कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी नागरीक करीत असल्याने अर्धवट कामे तातडीने पुर्ण करण्याची सुचना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना केली.
महापालिका सभागृहात सोमवारी विकास आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्मार्टसिटी, बुडा आणि महापालिकेच्या विकासकामाचा आणि कारभाराचा आढावा घेतला. स्मार्टसिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशीधर कुरेर यांनी राबविण्यात येणाऱया विकासकामाची माहिती दिली. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विकासकामे राबविण्यात बेळगाव स्मार्टसिटी कंपनी आघाडीवर असून शंभर शहरामध्ये 24 वा क्रमांक आहे. निविदा काढून विकासकामे राबविण्याबाबत देशात चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती दिली. तसेच स्मार्टसिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱया विविध प्रकल्पाची माहिती देताना स्मार्ट रस्ते, कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर, स्मार्ट बसथांबे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, ट्रॉमा सेंटर, स्मार्ट रूग्णवाहिका, 30 खॉटचे रूग्णालय आदी विकासकामे पुर्ण झाली असून कलामंदिर येथे बहुमजली व्यापारी संकुल, रस्त्याचा विकास मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास आदीसह विविध कामे युध्दपातळीवर सुरू असल्याचे शशीधर कुरेर यांनी सागितले.
स्मार्टसिटीचे कामे राबविताना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार आमदार अनिल बेनके यांनी केली. तसेच पथदिपाची समस्या मोठयाप्रमाणात भेडसावत असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत मनपा आणि स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांना सुचना करूनही दखल घेतली जात नाही. तसेंच काही ठिकाणी वर्षभरापासून कामे सुरू असल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आमदार बेनके यांनी केली. केबल घालण्यात आलेले खड्डे, तसेच जलवाहिनी घालण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्याची माहिती देवून वर्षानुवर्षे जैसे थे स्थिती असल्याची तक्रार विविध परिषद सदस्य महातेंश कवटगीमठ यांनी केली. तसेच याबाबतचा जाब स्मार्टसिटी कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना विचारला असता, याबाबत समर्पक उत्तरे देता आले नाही. सहकारी अभियंत्यांकडे बोट करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यामुळे कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरण्यात आले. एकंदर स्मार्टसिटीच्या कामाबाबत नाराजी सुर उमटले.
स्मार्टसिटी कामे राबविण्याबाबत तक्रारी वाढल्याने कामाचा दर्जा सुधारण्यासह विकासकामे तातडीने पुर्ण करण्याची सुचना केल्या. तसेच स्मार्टसिटी अधिकाऱयांनाच कामाबाबत व्यवस्थित माहिती नसल्याचे निदर्शनास आले तसेच स्मार्टसिटीची पीएमसी कंपनीच्या कामकाजाबद्दल तक्रारी झाल्याने स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयासह नगरविकास खात्याचे मुख्य सचिव आणि स्मार्टसिटी कंपनीचे चेअरमन आदींच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याची सुचना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केली.
बैठकीवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. एस.बी.बोमनहळी, मनपा आयुक्त के. एच .जगदीश, पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.एल.चंद्रप्पा, कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा आदीसह विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.