प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा
वृत्तसंस्था / पुरी
प्रत्येक घरात 24 तास शुद्ध पेयजल उपलब्ध असणारे ओडिशाचे जगन्नाथ पुरी हे देशातील पहिले शहर ठरले आहे. तसेच शहरात येणाऱया प्रत्येक पर्यटकासाठीही मोफत पेयजलाची व्यवस्था आहे. पुरीच्या अडीच लाख लोकसंख्येमागे 32 हजारांहून अधिक नळजोडण्या (कनेक्शन) आहेत. या शहरात दरवर्षी 2 कोटी भाविक दाखल होत असतात.
शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे फाउंटेन बसविण्यात आले आहेत, जेणेकरून कुठल्याही प्रवाशाला बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागू नये. यामुळे पुरीमध्ये वर्षाकाठी 3 कोटी प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी होणार आहे, म्हणजेच 400 मेट्रिक टन कचरा कमी होणार आहे.
स्वतःच्या या नव्या कामगिरीसह पुरी आता न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर आणि टोकियो सारख्या शहरांच्या यादीत सामील झाले आहे. मार्च 2022 पर्यंत कटक, राउरकेला, खुर्दा जटनी, बरहामपूर समवेत 15 अन्य शहरांमध्येही 40 लाख लोकसंख्येला ही सुविधा उपलब्ध होईल. सरकार सुजल (नळाद्वारे पेयजल) मोहिमेवर 1300 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे उद्गार ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काढले आहेत.
सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये भुवनेश्वर आणि पुरीच्या काही भागांमध्ये प्रायोगिक प्रकल्पाच्या स्वरुपात प्रत्येक घराला उच्च गुणवत्तेचे पाणी उपलध करण्याची मोहीम हाती घेतली होती. प्रारंभिक यशानंतर मोहीम पूर्ण पुरी शहरात लागू करण्यात आली. सरकारने या मोहिमेत महिलांच्या स्वयंसेवी संस्थांना भागीदार केले आहे. नळजोडणी देणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष देण्यासाठी पूर्ण टीम देखील (जलसाथी) महिलांचीच आहे.
चौकांमध्ये स्क्रीन
पुरीमध्ये दररोज 3.8 कोटी लिटर पाण्याचा वापर होतो. येथे 4.2 कोटी लिटर प्रतिदिनची क्षमता असलेला जलप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एक कॉल सेंटरही निर्माण करण्यात आले असून तेथे केवळ पाण्याची गुणवत्ता तसेच दाबाशी संबंधित तक्रारी हाताळण्यात येतात. तक्रार मिळताच मोबाइल वॉटर टेस्टिंग लॅबारेटरी घटनास्थळी जाऊन पाण्याची तपासण करते. पाण्याला 30 मापदंडांवर तपासण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहराच्या प्रमुख चौकांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेचा प्रत्यक्ष डाटा स्क्रीनवर झळकत असतो.