प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्याने कोरोना बाधितांचा 1200 आकडा ओलांडला असला तरी निष्यकाळजीपणा वाढाला आहे. सदरची परिस्थिती हाताळण्यास प्रशासन कुचकामी ठरत आहे, अशा वेळी सातारा जिल्हा आठवडय़ासाठी लॉकडाऊन करावा, अशी जोरदार मागणी गुरुवारी ‘तरुण भारत’ने केली होती. याची रि घेऊन साताराचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही जिह्यात लॉकडाऊन आवश्यक असल्याचा पुनर्चार केला आहे.
जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. सातारा जिह्यासह सातारा शहरातही आता कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. गेले दोन- तीन महिने लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होवून लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र लोकांना गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फिरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मर्यादा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास कोरोनाचे संकट अधिक गढद होणार असून तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन ओढावून घ्यावा लागेल, असा इशारा आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जनतेला दिला आहे.
कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना साथीला आळा घालण्यासाठी संपुर्ण देशात दोन ते तीन महिने लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद होती. छोटे-छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने हजारो-लाखो लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. हातावर पोट असणाऱया असंख्य लोकांची उपासमार होत होती. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांत सातारा जिल्हा आणि सातारा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असून ही मोठी चिंताजनक बाब आहे. नागरिक स्वत: मर्यादा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाही, हे महत्वाचे कारण म्हणावे लागले.
बाजारपेठ उघडी, मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक फिरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही या भ्रमात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रुग्ण संख्या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येवून पोहचला आहे. आता तरी जागे व्हा. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सुचना आ. शिवेंद्रराजे यांनी नागरिकांना केली आहे.
प्रशासनाच्या नियामांचे पालन करावे
कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनक बाब आहे. कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वत:च स्वत:ची काळजी घेतली पाहिजे तरच कोरोनापासून बचाव होणार आहे. पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थती नको असेल तर, लोकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोरोनपासून स्वत:चे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी विनाकारण बाहेर फिरु नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी जनतेला केले आहे.