प्रतिनिधी / सातारा :
सह्याद्री साखर कारखान्यावर होणारे एक रक्कमी ऊस दर आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, कार्यकारणी सदस्य अर्जुनराव साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, आंदोलनस्थळी जाणारे कार्यकर्ते, शेतकरी यांना ताब्यात घेतले.
यावेळी तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ म्हणाले, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडून मंत्रीपदाचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यांच्या सह्याद्री कारखान्यावर होणारे एक रक्कमी ऊस दर आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणाचा वापर करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सध्या चालू आहे, तिथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी करुन निवडणूकांचे फार्म भरले जातात. त्यावेळी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. जमाव बंदी आदेशाचा भंग झाला नाही. आणि शांततेच्या मार्गाने आपला हक्क मागणाऱ्या बळीराजाला आजच्या दिवशी परत सरकारी यंत्रणा घेऊन गाडण्याचा वामनरुपी आधुनिक अवतार घेऊन प्रयत्न करणारे सर्व प्रशासन व शासन यांचा जाहीर निषेध करत आहे.