जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : हणबर समाज हा कर्नाटकमध्ये मोठा समाज म्हणून ओळखला जातो. जवळपास 40 लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाला केवळ मतासाठी उपयोग करून घेतले जात आहे. हणबर समाजातील पौर्णिमा श्रीनिवास या चित्रदुर्ग जिल्हय़ातील हिरुर मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. मात्र त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही. तेव्हा हणबर समाजासाठी त्यांना मंत्रीपद द्यावे, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा हणबर (यादव) समाज सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले. हणबर समाज हा जवळपास 35 मतदारसंघांमध्ये विखुरलेला आहे. निवडणुकीवेळी आश्वासने दिली जातात. मात्र या समाजासाठी सरकारने काहीच केले नाही. हा समाज मागासलेला आहे. आतापर्यंत आमच्यावर अन्याय झाला आहे. तेव्हा पौर्णिमा श्रीनिवास यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
कन्नड साहित्य भवन येथून मोर्चा काढण्यात आला. चिकोडी विभागाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये बेळगावमधील हणबर समाजातील नागरिकांनीही भाग घेतला होता. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा हणबर (यादव) संघाचे अध्यक्ष शीतल मुंडे, सचिव मनोहर करोली, ऍड. एस. बी. पुजारी, रुद्राप्पा संगाप्पगोळ, बी. बी. बाडकर, डॉ. पाटील, सतीश टोपाई, संतराम कुंडरुक यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.