शेतकऱयांतून संताप, पुन्हा विरोध करणार
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने मनाई दिली आहे. असे असतानाही पुन्हा अलारवाड क्रॉसजवळील ब्रिजच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी मच्छेकडून हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ते प्रयत्न शेतकऱयांनी हाणून पाडले. मात्र आता शनिवारी पुन्हा या रस्त्याच्या कामाला सुरूवात केल्यामुळे जिल्हाधिकाऱयांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकऱयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने हा रस्ता करण्यास मनाई दिली आहे. असे असताना दडपशाही करत पुन्हा पुन्हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक प्रकारे न्यायालयाचा हा अवमानच आहे. असे असताना देखील रस्ता करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या रस्त्याची आणि परिसरातील जमिनीची पाहणी केली. तरी देखील पुन्हा ब्रिजचे काम सुरू केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हलगा-मच्छे बायपाससाठी घेतलेली जमीन ही तिबारपिकी आहे. बहुसंख्य शेतकऱयांनी या जमिनीचे पैसे देखील नाकारले आहेत. काही एजंट शेतकऱयांना आमिष दाखवविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यालाही शेतकऱयांनी विरोध दर्शविला आहे. शनिवारी अचानकपणे त्या ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता करण्यामागचे गौडबंगाल नेमके काय आहे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून स्वतःच्या जमिनी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे. या रस्त्याची काहीच गरज नाही. तसेच रस्ता करायचा झाल्यास पर्यायी मार्ग आहे. असे असताना येथूनच रस्ता का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. सुरू केलेले काम तातडीने बंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.