खानापूर येथील आंबेडकर ब्रिगेडच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
खानापूर / प्रतिनिधी
आपल्या देशात दिवसेंदिवस दलित महिला युवतींवर अत्याचार वाढत चालले आहेत. उत्तर प्रदेशमधील ‘हाथरस’ गावातही अशीच घटना घडली असून त्या गावातील चौघांनी दलित युवतीवर अत्याचार करून तिला मारले आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकार दलितांना संरक्षण देण्यात असमर्थ ठरल्याने ते बरखास्त करावे, अशा मागणीचे निवेदन खानापूर येथील आंबेडकर ब्रिगेडच्यावतीने तहसीलदार रेष्मा तालिकोटी यांना देण्यात आले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील हाथरस गावात दलित युवतीवर चौघांनी सामूहिक अत्याचार करून ठार केले. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या युवतीचा मृतदेह पोलीस संरक्षणार्थ तिच्या कुटुंबीयांनाही न बोलावता जाळून टाकला. उत्तर प्रदेश पोलिसानी या प्रकरणी त्या युवतीच्या अत्याचारास कारणीभूत असलेल्यांवर गांभीर्याने कारवाई न करता, उलट ते प्रकरण परस्पर दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याला उत्तर प्रदेश सरकारही तितकेच जबाबदार आहे. यामुळे सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, तसेच उत्तर प्रदेश सरकार राज्यातील दलितांचे संरक्षण करण्यात असमर्थ असल्याने ते सरकारही बरखास्त करावे, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन आंबेडकर ब्रिगेडचे प्रमुख लक्ष्मण मादार यांनी तहसीलदारांना सादर केले. यावेळी त्यांच्यासमवेत आदित्य मादार, पुट्टू हावनूर, भीमराव मादार, संतोष तळवार, राजू मादार, परशुराम तळवार, अब्दुल काजगी, मोद्दीन पठाण, सलिम बागवान, अब्दुल शेख, अलमास तिगदी, जुबेर बागवान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.