खानापूर तालुक्याच्या विकासात आडकाठी आणली तरी जोमाने कार्य करणार : आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या साडेतीन वर्षात बरीच विकासकामे मार्गी लागली आहेत. ही विकासकामे करताना काही राजकीय मंडळी स्वार्थापोटी आडकाठी आणू पाहत आहेत. पण तालुक्याच्या विकासाचा रथ थांबणार नाही. खानापूरच्या हायटेक बसस्थानकाचे काम येत्या 8 महिन्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी रविवारी येथे हायटेक बसस्थानक भूमिपूजन समारंभात बोलताना दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, खानापूरला हायटेक बसस्थानक व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रस्तावाच्या विशेष पाठपुराव्यानंतर जुलै 2020 मध्ये अर्थखात्याकडून बसस्थानकासाठी निधी मंजूर झाला. पण कोरोनाचे कारण पुढे करत बांधकामाची निविदा काढण्यात जाणुनबुजून विलंब करण्यात आला. पण सततच्या पाठपुराव्यामुळे ऑगस्ट 2021 मध्ये हायटेक बसस्थानकाच्या बांधकामाची निविदा काढण्यात आली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात निविदा मंजूर होऊन संबंधित कंत्राटदाराला बांधकाम सुरू करण्याचा आदेश प्राप्त झाला. सर्व सोपस्कार पूर्ण करूनच भूमिपूजनासाठी 13 मार्चचा दिवस निश्चित करून परिवहन खात्याने भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिका काढल्या. माझ्यासकट संबंधितांना परिवहन विभागाच्या अधिकाऱयांनी प्रत्यक्ष येऊन निमंत्रण पत्रिका दिल्या. पण ऐनवेळी म्हणजे शनिवार दि. 12 रोजी सायंकाळी भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थगित झाल्याचे परिवहन अधिकाऱयांनी मला दूरध्वनीवरून कळविले. मात्र, याचे नेमके कारण दिले नाही. त्याचवेळी मी परिवहन अधिकाऱयांना कुठल्याही परिस्थितीत रविवारी ठरलेल्या वेळेत तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन मी भूमिपूजन करणारच, असे ठामपणे सांगितले. यासाठी तालुक्यातील जनतेचे मोठे सहकार्य मिळाल्याने रविवारी भूमिपूजन केले जात आहे.
जुन्या बसस्थानक इमारतीमध्ये दुकानगाळे
खानापूर हायटेक बसस्थानकाच्या एकूण आराखडय़ाविषयीची माहिती देताना आमदार डॉ. निंबाळकर पुढे म्हणाल्या, या ठिकाणी एकाच वेळी 13 बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य राष्ट्रीय महामार्गावरच बसस्थानकात प्रवेश करण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याच आवारात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, रिक्षा पार्किंग, दुचाकी पार्किंग तसेच सध्या असलेल्या बसस्थानकाच्या इमारतीमध्ये दुकान गाळे बांधले जाणार आहेत. पारिश्वाड रस्त्याकडून बसेस आत प्रवेश करणार असून महामार्गाच्या दिशेने बाहेर पडणार आहेत. एकूणच हायटेक बसस्थानकामुळे खानापूर शहराच्या वैभवात आगळी भर पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी तसेच रमेश देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरपंचायत स्थायी कमिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, रियाझ पटेल, जॅकी फर्नांडिस, गौसलाल पटेल यांची भाषणे झाली. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सुरू केलेल्या विकासकामाला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. तालुक्याच्या विकासासाठी आमदारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कार्यक्रमाला खानापूर शहर तसेच तालुक्यातील नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.