प्रतिनिधी/आजरा
मुंबई येथून हारूर येथे आलेल्या दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे शनिवारी पहाटे कोल्हापूर येथील सी. पी. आर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रथम संपर्कात आलेल्या 26 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यामध्ये रूग्णवाहीकेच्या चालकाचाही समावेश असून त्यांच्या घशातील स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान मुंबई येथून आलेल्या दोन रूग्ण पॉझिटीव्ह निघाल्याने आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मुंबई येथील रूग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचा मृतदेह घेऊन पोलीस दलात कार्यरत असलेली सदर महिला व तीचा दुसरा मुलगा मूळगांव हारूर येथे बुधवारी आले होते. मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेह घेऊन आलेल्या तिघांनाही तपासणीसाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या तिघांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते. त्यातील मयत मुलाची आई व लहान भावाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर तिसऱया महिलेचा अहवाल निगेटीव्ह आला. शुक्रवारी मध्यरात्री हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर तालुका प्रशासनाने शनिवारी पहाटे पॉझिटीव्ह रूग्णांना सी. पी. आर रूग्णालयात दाखल केले असून निगेटीव्ह अहवाल आलेल्या महिलेला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी हारूर व सरंबळवाडीसह परीसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर हा परीसर पोलीस प्रशासनाने सील केला आहे. शनिवारी दिवसभर तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भांगे यांनी हारूर येथे तळ ठोकला होता. बाधित रूग्णांच्या प्रवासाची माहिती घेण्याबरोबरच त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या आठ जणांसह 26 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर बाधित रूग्णांना गडहिंग्लजहून आजरा येथे घेऊन आलेल्या आरोग्य विभागाच्या रूग्णवाहीका चालकालाही क्वारंटाइन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आजरा शहरही कडकडीत बंद तालुक्यातील हारूर या गावी दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने शनिवारी दिवसभर आजरा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. हारूर येथील बाधित रूग्ण आजरा शहरातील कोणाच्या संपर्कात आलेत काय याची माहिती प्रशासनाकडून घेतली जात होती. संपर्कातील एखादी व्यक्त बाजारपेठेत फिरून गेल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी म्हणून शनिवारी आजरा शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. |
शनिवारी दिवसभरात घेतले 53 जणांचे स्वॅप शनिवारी दिवसभरात हारूर येथील रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व नाइतेवाई अशा 26 जाणांचे तर संस्थात्मक विलगीकरण कक्षातील 5 असे 31 जणांचे स्वॅप घेण्यात आले. शिवाय पुणे, मुंबई येथून आजऱयात आलेल्या 21 व परराज्यातून आलेला 1 असे एकूण 53 जणांचे स्वॅप घेऊन तपासणीसाठी पाठवून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार विकास अहिर यांनी दिली. |