ऑनलाईन टीम / मुंबई :
हिंगणघाट येथील जळीत प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारच्या वतीने
ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उज्ज्वल निकम बाजू मांडणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
हा खटला लवकरात लवकर निकाली काढून या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. काही ठिकाणी मोर्चे आणि निदर्शनेही करण्यात आली. त्यापार्श्वभूमीवर सरकार हा खटला जलदगती न्यायालयात चालविणार आहे. त्याचा खर्चही सरकार करणार आहे.
हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एकतर्फी प्रेमातून विकी नगराळे या तरुणाने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तरुणी मोठय़ा प्रमाणात भाजली गेली. तिची वाचा गेली आहे. डोळेही जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असून, ऑरेंज सिटी रुग्णालयात तिचावर उपचार सुरू आहेत.