किन्नौर जिल्हय़ात भूस्खलन – सर्व मृत दिल्ली-एनसीआरमधील
शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्हय़ातील सांगला खोऱयात दरड कोसळल्यामुळे रविवारी मोठी दुर्घटना घडली. पर्यटकांच्या गाडय़ांवर डोंगरावरील दगड व माती कोसळल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत पर्यटक दिल्ली-एनसीआरमधून पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर या भागात झालेल्या भूस्खलनात एक पूलही तुटला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली आहे.
किन्नर जिल्हय़ातील बाटेसरीच्या गुनसाजवळ भूस्खलनाची दुर्घटना घडली. येथे सांगलाच्या दिशेने येणाऱया पर्यटकांच्या गाडय़ांवर दरड कोसळली. प्राथमिक माहितीनुसार सध्या 9 लोकांचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जवळपास दोन-चार गाडय़ा दरडींच्या विळख्यात सापडल्या होत्या. मात्र, त्या सुदैवाने निसटल्याने मोठी जीवितहानी टळली. सदर पर्यटक दिल्ली आणि चंदिगडहून हिमाचलच्या दर्शनासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासन पथके घटनास्थळी दाखल झाली. मदत व बचावकार्य चालू आहे. या भागात सातत्याने दरडी कोसळत असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. किन्नौरचे एसपी सजू राम राणा यांनी बाथसेरी पूल तुटल्याचे सांगितले आहे.