कोनवाळ गल्ली येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समिती-सिंहगर्जना युवक मंडळाच्यावतीने अभिवादन : मराठी भाषिकांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
शिवसेनेने 1969 मध्ये सीमाभागासाठी अन्यायकारक ठरलेला महाजन अहवाल गाडावा, यासाठी 67 हुतात्मे दिले. या हुतात्म्यांना मंगळवारी कोनवाळ गल्ली येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समिती व सिंहगर्जना युवक मंडळाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सीमाप्रश्नासाठीचे योगदान मोठे असून हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून मराठी भाषिकांना लढण्याचे बळ मिळते, अशा शब्दात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबवायचा असेल तर सीमाभाग केंद्रशासित झाल्याशिवाय पर्याय नाही. मराठी तरुणांना हिंदूत्वाचे कारण दाखवत राष्ट्रीय पक्ष आपल्याकडे खेचून घेत आहेत. परंतु खर हिंदूत्व हे महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांकडेच आहे, हे नुकत्याच झालेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अवमानाप्रसंगी दिसून आले. हुतात्म्यांनी सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गल्लोगल्ली हुतात्मादिन पाळावा, असे आवाहन त्यांनी मराठी भाषिकांना
केले.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले, सीमाप्रश्नाच्या प्रत्येक लढय़ात शिवसेनेने हिरीरिने भाग घेतला आहे. सीमाप्रश्नासाठी शिवसेनेने 67 हुतात्मे दिले असून आजही शिवसेना मराठी भाषिकांच्या बाजूने उभी आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार त्यांनी मांडले.
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, मराठी भाषिकांवर आजही अन्याय, अत्याचार होत
आहेत. देशाचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर बेंगळूर येथे शाई टाकण्यात
आली. याचा निषेध करण्यासाठी जमलेल्या तरुणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आपले राष्ट्रप्रेम, देशप्रेम यापुढे व्यक्त करायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे
त्यांनी सांगितले.
संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करणे आवश्यक
माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय थांबवायचा असेल तर संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करणे आवश्यक आहे. यामुळे जोपर्यंत न्यायालयात न्याय मिळणार नाही तोपर्यंत तरी अन्याय सहन करावा लागणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर म्हणाल्या, अनेक हुतात्म्यांनी आपले रक्त सांडून सीमालढा उभारला आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाची सोडवणूक कोणत्या मार्गाने होईल, याबाबत आपली वाटचाल असावी, असे त्या म्हणाल्या.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील
खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील म्हणाले, सीमाप्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु न्यायालयाबाहेरदेखील तोडगा काढता येईल का? यासाठी चाचपणी होणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने सीमाभागातील सर्व नेत्यांनी एकत्रित येवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुका समितीचे सरचिटणीस मनोज पावशे म्हणाले, हुतात्मे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. लोकशाहीमार्गाने सुरू असलेला हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, असे त्यांनी
सांगितले.
यावेळी नगरसेवक रवी साळुंके, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, सुधा भातकांडे, राकेश पलंगे, सूरज कुडुचकर, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, प्रवीण रेडेकर, गजानन निलजकर, शशिकांत हावळ, यशवंत बिर्जे सिंहगर्जना युवक मंडळाचे कार्याध्यक्ष अभिजित सुनगार, सेपेटरी बाळू मासरणकर, विनायक बेळगावकर, चंद्रशेखर चौगुले, दिनेश देसूरकर, वसंत शिंदोळकर, दत्ता पाटील, सुहास किल्लेकर, किसन सुंठकर, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्यासह नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ सूर्यवंशी यांनी केले.