सहापदरी महामार्ग विकसित होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था राहणार
वार्ताहर / हुबळी
हुबळी-धारवाड बायपासवर दुर्घटना टाळण्यासाठी प्राधिकरण आता ‘ओव्हरटेक’ विषयक उपाययोजना दर 2-3 किलोमीटर अंतरावर उपलब्ध करण्याचे नियोजन करत आहे. सहापदरी महामार्ग विकसित होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था राहणार आहे.
या मार्गावरील बहुतांश दुर्घटनांमागे ओव्हरटेक हेच मुख्य कारण ठरले आहे. अलिकडेच 12 जणांचा जीव घेणाऱया दुर्घटनेमुळे प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले गेले आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागल्यावर वाहतूक आयुक्तांनी दुर्घटनास्थळाचा दौरा करत ओव्हरटेकची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्वरित बदल करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे.
15 जानेवारी रोजी 12 जणांचा जीव घेणाऱया दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली आहे. अधिकाऱयांना अनेक निर्देश दिले आहेत. दुर्घटना रोखण्यासाठी अधिकाऱयांना आणखीन सूचना करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक आयुक्त शिवकुमार एन. यांनी दिली आहे.
हुबळी-धारवाड बायपासवर बहुतांश दुर्घटना वाहनांच्या ओव्हरटेकिंगमुळे घडल्याचे आढळून आले आहे. बायपासवरील ‘बॉटलनेक’ आकारामुळे तेथे ओव्हरटेक करणे अत्यंत अवघड ठरते, यातूनच दुर्घटना घडतात. बायपासवर वाहनांच्या ओव्हरटेकिंगसाठी उपाययोजना करण्याची गरज या पाहणीतून दिसून आल्याचे वाहतूक आयुक्तांनी म्हटले आहे.
तरतुदीकरिता अधिकाऱयांना निर्देश
जिल्हास्तरीय अधिकारी यात सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस यांच्यासोबत बैठक घेतली आहे. बायपासवर वाहनांच्या ओव्हरटेकिंगच्या तरतुदीकरिता अधिकाऱयांना निर्देश दिले असून यात अनेक दुर्घटना टाळता येणार आहेत. धोकादायक ठिकाणी एलईडी लाइट्स बसविण्याची आणि टोलनाक्यांवर प्रत्येक वाहनधारकाला पत्रके देण्याची सूचना करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
प्रशासनाने गांभीर्य दाखविल्याचे आणि अनेक गोष्टींचे नियोजन केल्याचे पाहून बरे वाटले. पण या उपाययोजना प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत आणि त्यांची प्रभावी तसेच त्वरित अंमलबजावणी व्हायला हवी असे उद्गार सामाजिक कार्यकर्ते अमोघ पुजार यांनी काढले आहेत.