विद्यार्थ्यांच्या दोन गटात मॅचवरून किरकोळ वादावादी
प्रतिनिधी/ सातारा
महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी सकाळी 11.30 च्या दरम्यान दोन गटातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून वादावादी सुरू केली. किरकोळ मॅचच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्यात धराधरी झाली. ही बाब निर्भया पथकांतील पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताणले. यातील काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेवून कारवाई केल्याने तरूणांमध्ये दिवसभर या कारवाईची चर्चा रंगली होती.
महाविद्यालय परिसरात नेहमी विद्यार्थी-विद्यार्थीनीच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत असतात. या वादाचे रूपांतर हाणामारीत होते. असा प्रकार सोमवारी वायसी कॉलेज परिसरात घडला. सकाळच्या सुमारास धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजचे विद्यार्थी एकत्र जमले होते. सुरूवातीला या विद्यार्थ्यांच्यात मॅचवरून चर्चा सुरू होती. बघता बघता या चर्चेला वादाचे स्ग्नवरूप प्राप्त झाले. हा वाद इतका वाढला की, विद्यार्थ्यांच्यात धरपकड सुरू झाली. यामुळे हा वाद सोडवण्यास आणि बघण्यास गर्दी उसळली. ही गर्दी पाहताच निर्भया पथकांतील पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना बघून या विद्यार्थ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांना निर्भया चौकीत बसवून ठेवण्यात आले. यातील काही विद्यार्थी कारवाई करू नका, पुन्हा अशी चूक होणार नाही अशी विनंती करत होते. निर्भया पथकांच्या कारवाईने विद्यार्थ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून कारवाईची चर्चा अवघ्या काही तासातच सर्वत्र पसरली होती.