वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघाने येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे ध्येय बाळगावे, असे मत भारताचा माजी हॉकी कर्णधार वासुदेवन भास्करनने व्यक्त केले आहे.
भारतीय हॉकी संघाने केवळ ऑलिम्पिक वारी करणे महत्त्वाचे समजू नये, प्रत्येक चार वर्षांनी होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हॉकी या क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष संघाने पदक पटकाविणे हे उद्दिष्ट ठेवावे. भारतीय पुरुष हॉकी संघाला या स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी आपल्या दर्जामध्ये सुधारणा करणे जरुरीचे आहे. खडतर सराव आणि योग्य ताळमेळ ठेवल्यास भारतीय संघाला या स्पर्धेत यावेळी पदक मिळविण्याची नामी संधी असल्याचे भास्करनने म्हटले आहे. 1980 साली झालेल्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघाचे नेतृत्त्व भास्करन यांनी केले होते. मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचे कास्यपदक थोडक्यात हुकले होते. टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाला भास्करन यांनी शुभेच्छा दिल्या असून हॉकी क्षेत्रातील गतवैभव पुन्हा पहावयास मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.