गोयंचो आवाज संघटनेची मागणी
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री सावंत यांनी नकतेच एक विधान केले की 60 वा गोवा मुक्तीदिन साजरा करण्यासाठी केंद्राकडे 100 कोटी कर्ज मागितले आहे. परंतु यापूर्वी 25 हजार कोटी रूपयांचे कर्ज गोव्यावर आहे. 100 कोटीचे कर्ज मागण्यापूर्वी 25 हजार कोटी रूपयांचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करावा. सध्या गोवा प्रकल्पांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. भाजप सरकार गोमंतकीयांना फसवत आहे. गोवा नष्ट करण्यासाठी भाजप सरकार आहे. गरज पडली तर गोवामुक्तीदिनाच्यावेळी निदर्शने करू असा इशारा गोयंचो आवाजचे कॅप्टन फर्नांडिस यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी गोयंचो आवाज संघटनेचे सहसमन्वयक स्वप्नेश शेर्लेकर, रोशन माथायस, रेजिना उपस्थित होते.
कोरोना काळात गोमंतकीयांची परिस्थिती बिकट आहे. योजना अजून लाभ मिळाला नाही. ऋण असताना गोवा मुक्तीदिन साजरा करण्यासाठी आणखी केंद्राकडून 100 कोटी रूपये कर्ज घेत आहे. मुक्तीदिन साजरीकरणाच्या नावावर हे रूपये निवडणूकीच्या बेकायदेशीर कार्यात गुंतवण्यासाठी घेतले जात आहे. हे पैसे मागण्यात सरकारला लाज वाटायला हवी. पर्यटनक्षेत्रात अव्वल असतानाही अजून गोवा कर्जात आहे. रोजच्या वस्तू मिळविण्यासाठी गोमंतकीय काटकसर करत आहेत. यासाठी विशेष समिती मुख्यमंत्रींनी नियुक्त केली आहे. परंतु कारोना काळात जी समिती नियुक्त करण्यात आली होती त्या समितीचे काय झाले. फक्त समिती येतात पैसे खर्च होतात. त्यातून गोमंतकीयांना काहीच मिळत नाही. गोमंतकीयांची मस्करी करणे मुख्यमंत्र्यांनी थांबवावे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी असा इशारा रोशन माथायस यांनी दिला.
गोवा मुक्तीदिन साजरा करण्यासाठी गोव्यात असे काय ठेवले. यापूर्वी गोवा विकून टाकण्याची तयारी सरकारने केली आहे. हातात पैसे नाहीत तर उत्सव साजरीकरण करण्याची काय गरज. जिल्हा पंचायत निवडणूका येत असल्याने नोकऱयांचे आमिष दाखवून सरकार गोमंतकीयांना फसवत आहे असे स्वप्नेश शेर्लेकर यांनी सांगितले.