ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचे मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात या चारही मृतांना शरीराच्या डोके, छाती अशा महत्त्वाच्या भागात एकूण 11 गोळ्या लागल्याचे म्हटले आहे.
31 जुलैच्या पहाटे मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह याचा सहकारी जवानांसोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने चेतन सिंह याने सहकारी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. जे जे रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार आरपीएफचे एएसआय टीकाराम मीणा यांना 4 गोळ्या लागल्या होत्या. तर असगर अब्बास शेख यांना 3 गोळ्या, मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला आणि सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांना प्रत्येकी 2 गोळ्या लागल्या होत्या. अवयवांना गोळ्या लागल्याने अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात चेतन सिंह याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
पाच जणांच्या उच्चस्तरीय कमिटीची स्थापना
या प्रकरणाच्या तपासादरम्यान 5 जणांच्या उच्चस्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे पी सी सिन्हा, अजोय सधन्य, नरसिन्ह आणि मध्य रेल्वेचे जे पी रावत, प्रभात आणि यांचा कमिटीत समावेश करण्यात आला आहे.