बेळगाव जिल्हय़ातील परिस्थिती : विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना नंतरच्या काळात सरकारी शाळांमधून हजारो विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. बेळगाव जिल्हय़ात 1 हजार 793 विद्यार्थी शाळेपासून दूर असल्याची माहिती उघड झाली आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप सुरू आहे. बरेच विद्यार्थी परिस्थितीमुळे शाळेपासून दूर जात विविध कामांवर रूजू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करते हे पहावे लागणार आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार 6 ते 16 वयोगटातील विद्यार्थी शाळेपासून दूर जात आहेत. राज्याचा विचार करता एकूण 27 हजार सरकारी शाळांमधील विद्यार्थी शाळेपासून दूर गेले आहेत. यात सर्वाधिक बेंगळूर येथील विद्यार्थ्यांची संख्या आहे. कोरोना काळात ओढवलेल्या परिस्थितीने राज्यातील 46 हजार 592 विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेले होते. त्यापैकी 19 हजार 416 विद्यार्थ्यांना परत शाळेपर्यंत आणण्यात आले आहे. 1 हजार 45 विद्यार्थ्यांचे इतरत्र स्थलांतर झाले आहे. 38 विद्यार्थ्यांचे बालविवाह, 1245 विद्यार्थी कुटुंबाची जबाबदारी, 380 मुले आजारी, 2 हजार 213 विद्यार्थी कुटुंबातील इतर कामांमध्ये तर 53 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी शिक्षकांचे अनेक प्रयत्न
शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षक अनेक प्रयत्न करीत आहेत. सरकारी शाळांमध्ये दाखल होणाऱया विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार, मोफत गणवेश, मोफत सायकल, पुस्तके यासह इतर खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. परंतु कौटुंबिक जबाबदारी पडल्यामुळे विद्यार्थी शाळांपासून दूर जात असल्याचे कारण पुढे येत आहे.