प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेळगावची विमानसेवा सुरू झाली. आता ही विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. मागील 18 दिवसांमध्ये 3 हजार 500 प्रवाशांनी विमान प्रवास केला असून, 151 विमानांची ये-जा झाली आहे. यामुळे विमानप्रवासाला प्रवाशांमधून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच 25 मार्चपासून बेळगाव विमानतळावरील सेवा बंद होती. त्यानंतर दोन महिने प्रवासी विमान सेवा पूर्णपणे ठप्प होती. 25 मे पासून पुन्हा ही सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या काही दिवसांमध्ये अत्यंत कमी प्रवासी विमान प्रवास करीत होते. परंतु आता ही संख्या वाढताना दिसत आहे. सध्या बेळगाव विमानतळावर बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, म्हैसूर, पुणे, अहमदाबाद, इंदूर, अजमेर या शहरांना विमान सेवा सुरू आहे.
752 विमानांची ये-जा
कोरोनापूर्वी फेबुवारी महिन्यात एकूण 38 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. तर 752 विमानांची ये-जा होती. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या विमानतळांमध्ये बेळगावची गणना होत होती. व्यावसायिकदृष्टय़ा बेळगाव महत्त्वाचे असल्याने आसपासच्या राज्यातील प्रवाशांची नेहमी ये-जा असते. परंतु कोरोनानंतर ही संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे 38 हजार प्रवास करणाऱया विमानतळावरील प्रवासी संख्या सध्या 3 हजारांवर पोहोचली आहे.
कोरोनाबद्दलची भीती हळू हळू कमी होत असल्यामुळे विमान प्रवास करणाऱयांची संख्या वाढू लागली आहे. बेळगाव विमानतळावर येताच प्रवाशांची आरोग्य तपासणी करूनच त्यांना पुढे पाठविले जात आहे. इतर राज्यांतून येणाऱया प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. विमानतळावर सर्व त्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.