वर्कशॉपमधील सांडपाणी पंचगंगेत मिसळत असल्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारवाई
सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच वर्कशॉप बाहेर
मनपाचा दावा
कोल्हापूर प्रतिनिधी
वर्कशॉप विभागातील सांडपाणी महापालिकेला डोकेदुखी ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण परवाना (संमती) घेतला नसल्याने मार्च माहिन्यांत महापालिकेला 32 लाखांच्या दंड भरण्याची नोटीस बजावली होती. आता सांडपाणी जयंती नाला मार्गे थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याने तेरवाड येथे मासे मृत झाल्यावरून तब्बल 2 कोटी 20 लाखांचा दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहेत.
कोल्हापूर महापालिकेचे उमा टॉकीज परिसरातील सुभाष स्टोअर येथे वर्कशॉपमधून नादुरूस्त वाहनांची दुरूस्ती होते. वाहनांचे सर्व्हींसिंग झाल्यानंतर दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत जात असल्याचा दावा करत कोल्हापुरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पर्यावरण परवाना (संमती) न घेताच वर्कशॉपमध्ये कामकाज सुरू असल्याचेही म्हटले आहे. यावर लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचे आदेश दिले. यानुसार प्रदूषण मंडळाने एप्रिल 2022 मध्ये महापालिकेला नोटीस बजावली. वर्कशॉपने पर्यावरण परवाना घेतला नसल्याने 1982 पासून आतापर्यंतचा 27 लाख रूपये दंड आणि 5 लाख रूपये परवाना फी अशी 32 लाख रूपये जमा करण्याचे यामध्ये म्हटले होते. यानंतर महापालिकेनेही पर्यावरण परवानासाठी प्रयत्न सुरू केले. 25 हजार रूपये फि भरून परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन अर्जही केला आहे. वर्कशॉपमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी (इटीपी) एफ्लुएंट ट्रीटमेंट प्रोसर्स प्लँट उभारला. दरम्यानच्या कालावधीत याचिकाकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने महापालिकेवर पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोणतीच कारवाई होत नसल्याचे सांगून हरित लवादाकडे कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाच्या आदेशानुसार थेट 2 कोटी 20 लाखांचा दंडाची नोटीस महापालिकेला बजावली.
पाण्याने वाहने धुतो, मग प्रदूषण कसे
महापालिकेची दुरूस्तीसाठी येणाऱया वाहने साबण, केमिकल, जळके ऑईल अथवा शॅम्पोने नव्हे तर पाण्याने धुतली जातात. सहा महिन्यांपासून वर्कशॉपमधील सर्व्हिसींगचे सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडले जात असल्याची माहिती वर्कशॉप विभागातील संबंधित अधिकाऱयांनी दिली आहे.
मनपा दंड माफ करण्याची मागणी करणार
चार दिवसांपूर्वी 2 कोटी दंडाची नोटीस आली असून यावर शनिवारपर्यंत उत्तर दिले जाणार आहे. वास्तविक प्रक्रिया करूनच वकॅशॉपमधून पाणी बाहेर सोडले जाते. तसेच जयंती नाल्यातील सांडपाणी कसबा बावडय़ातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया होऊनच पंचगंगेत सोडले जाते. मनपाही नागरी सेवा देणारी संस्था असल्याने दंड माफ करा, अशी मागणी करणार असल्याचे मनपा पर्यावरण विभागातील संबंधितांकडून दिली आहे.