कारगिल हिरो कॅप्टन बत्रा-मनोज पांडे यांच्या नावे ओळखली जाणार
पोर्ट ब्लेअर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अंदमान-निकोबारच्या 21 बेटांना सोमवारी देशातील परमवीरचक्र विजेत्यांचे नाव प्राप्त झाले. हे नामकरण करण्यात आलेल्यांमध्ये भारत-चीन युद्धात पायाने मशीनगन चालवणारे मेजर शैतान सिंह, कारगिल युद्धातील ‘हिरो’ कॅप्टन विक्रम बत्रा आणि मनोजकुमार पांडे यांच्या नावांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. याप्रसंगी बेटावर उभारण्यात येणाऱया नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समर्पित स्मारकाच्या मॉडेलचे अनावरणही करण्यात आले.
अंदमान आणि निकोबारमधील बेटांचे नव्याने नामकरण करत पंतप्रधानांनी त्यांना नवी ओळख प्राप्त करून दिली. मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि कॅप्टन (तत्कालीन लान्स नायक) करम सिंग, द्वितीय लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, मेजर शैतान सिंग, कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोंन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, सुभेदार मेजर संजय कुमार आणि सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव आदींची नावे बेटांना देण्यात आली आहेत
अंदमानच्या भूमीवर प्रथम तिरंगा फडकला ः पंतप्रधान
आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून हा दिवस देश पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. अंदमानच्या या भूमीत सर्वप्रथम तिरंगा फडकवण्यात आला होता. येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन झाले. वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांना या अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगावा लागला. मी 4-5 वर्षांपूर्वी पोर्ट ब्लेअरला गेलो असता तेथील 3 मुख्य बेटांना भारतीय नावे समर्पित केली होती, असे पंतप्रधान यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.
‘एक भारत, श्रे÷ भारत’ संदेश
आज ज्या 21 बेटांना नवीन नावे मिळाली आहेत, त्यांच्या नामकरणात अनेक संदेश आहेत. तरीही ‘एक भारत, श्रे÷ भारत’ हा मुख्य संदेश आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आपल्या सर्व 21 परमवीरचक्र विजेत्यांचा ‘इंडिया फर्स्ट’ हा एकच संकल्प होता. आज या बेटांना त्यांचे नामकरण झाल्याने मोठी संकल्पपूर्ती झाली आहे. अंदमानची क्षमता प्रचंड आहे. गेल्या 8 वर्षांत देशाने या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. अनेक दशकांपासून देशाची क्षमता कमी लेखण्यात आली होती. पण आता आधुनिक विकासाच्या शिखरांना स्पर्श करू शकणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारतातील बेटांमध्ये जगाला देण्यासारखे बरेच काही आहे. पण पूर्वी ही क्षमता ओळखली गेली नाही, अशी खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
लष्कराचा उत्साह वाढेल ः अमित शहा
पंतप्रधान मोदींच्या या उपक्रमांतर्गत अंदमान-निकोबारमधील 21 प्रमुख बेटे आमच्या परमवीर चक्र विजेत्यांच्या नावांशी जोडली गेली आहेत. आता त्यांची आठवण कायम राहील. तसेच सैन्याचा उत्साह वाढेल, असे यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या दौऱयावर सोमवारी सकाळी अंदमान-निकोबारला पोहोचले. येथे त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126व्या जयंती सोहळय़ात भाग घेतला.
कारवारच्या वीरपुत्राचे नाव अंदमानच्या बेटाला
राम राघोबा राणे यांचा जन्म 26 जून 1918 रोजी आताच्या कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हय़ातील चेंडिया गावात झाला होता. राम राघोबा राणे हे दुसऱया महायुद्धादरम्यान ब्रिटिश भारतीय सैन्यात कार्यरत होते. 15 डिसेंबर 1947 रोजी त्यांची भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय सैन्याद्वारे राजौरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच भारतीय रणगाडय़ांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी राणे यांनी दाखविलेले शौर्य अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. या शौर्यासाठी त्यांना 8 एप्रिल 1948 मध्ये परमवीर चक्राने गौरविण्यात आले होते. 1968 मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले होते.