पुणे / वार्ताहर :
व्याजाने घेतलेल्या 10 लाखांच्या बदल्यात 21 लाख रूपये परत देऊनही आणखी 20 लाखांसाठी खासगी सावकाराने कर्जदाराचे अपहरण करुन त्याला हातपाय तोडण्याची धमकी दिली. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास येरवडय़ातील गुंजन चौकात ही धक्कादायक घटना घडली.
अतुल उर्फ पप्पू कुडले (रा. दत्तवाडी, पुणे), बांदल, बालाजी उर्फ भैय्या कदम यांच्याविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष विष्णू तिंबोळे (रा. जुनी सांगवी, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
अधिक वाचा : भाई न म्हटल्यामुळे तरुणावर जीवघेणा हल्ला; तिघांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर येरवडा कारागृहात असताना फिर्यादी संतोष आणि आरोपी अतुलची ओळख झाली होती. त्यानंतर संतोषने अतुलकडून 10 लाख रूपये व्याजाने घेतले होते. दरम्यानच्या काळात संतोषने त्याला 10 लाखांच्या बदल्यात 21 लाख रूपये परत दिले होते. मात्र, आरोपी अतुलने संतोषला पुन्हा 20 लाख रूपये देण्याचा तगादा लावला. पैसे न दिल्यामुळे इतर साथीदारांच्या मदतीने त्यांनी संतोषचे मोटारीतून अपहरण केले. तसेच जबरदस्तीने त्याच्या खिशातील 82 हजार रूपये काढून घेऊन मारहाण केली. उर्वरीत व्याजाचे 20 लाख दिले नाहीत, तर आम्ही तुझे हातपाय तोडू, अशी धमकी देत आरोपींनी रात्री उशिरा त्याला सोडून दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एन गुरव पुढील तपास करीत आहेत.